<p><strong>अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar</strong></p><p>जिल्ह्यात नावजलेल्या कापडबाजारासह पेठेला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. अतिक्रमणावर हतोडा टाकून हे ग्रहण तातडीने सोडवा अशी मागणी महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशने केली आहे. त्यासाठी व्यापारी प्रभारी आयुक्त तथा कलेक्टरांच्या द्वारी पोहचले.</p>.<p>कापड बाजार, गंजबाजार, शहाजी रोड, नवी पेठ, मोची गल्ली ही बाजारपेठ संपूर्ण महाराष्ट्रात नावाजली जाते. यातील कापड बाजाराला राज्यात वेगळे स्थान आहे. गेल्या काही वर्षात बाजारपेठेला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. बाजारपेठेचा परिसर अतिक्रमण व समस्यामुक्त करणे गरजेचे असून यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे केली. असोसिएशनचे अध्यक्ष श्यामराव देडगावकर, सेक्रेटरी किरण व्होरा यांनी तसे निवेदन दिले आहे. </p><p>कलेक्टर भोसले यांच्याकडे आयुक्त पदाचा चार्ज असल्याने महापालिका प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता आली आहे. आता प्राधान्यक्रमाने नगर शहरातील बाजारपेठेचा अनेक वर्षांपासून कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी पावले उचलावीत अशी विनंती व्यापार्यांनी केली आहे. महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक जाग येईल तेव्हा बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम राबवते. </p><p>मात्र अनेकदा पथक येण्याची टीप फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेत्यांना आधीच मिळते. त्यामुळे ते आधीच गाशा गुंडाळतात. अतिक्रमण विरोधी पथकाची पाठ फिरताच अवघ्या काही मिनिटात विक्रेते पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करतात, हे नेहमीचे झाले आहे. </p><p>महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे व रस्त्यावर अवैद्य रित्या व्यवसाय करणारे विक्रेते यांच्यातील पाठशिवणीचा खेळ आता सर्वांनाच ज्ञात झालेला आहे. त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. सध्या संपूर्ण बाजारपेठेतील रस्ते फेरीवाल्यांच्या विळख्यात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ग्राहकांना बाजारपेठेत येऊन खरेदी करण्याची इच्छा असली तरी वाहतूक कोंडी, रस्त्यावरील विक्रेत्यांची आरेरावी त्यामुळे ते उपनगरांमध्येच खरेदी उरकून घेतात. </p><p>त्याचा थेट परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवर होत आहे. अनेक दुकानदार, व्यावसायिकांची मोठी गुंतवणूक करून बाजारपेठेत जागा घेतल्या आहेत. शोरूम थाटल्यावर मोठा खर्च केलेला आहे. परंतु, बाजारपेठेत ग्राहक येत नसल्याने व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.</p>.<p><strong>मोठे व्यापारी निघाले उपनगराकडे</strong></p><p><em>नगरची बाजारपेठ बुधवारी बंद असते. हा बंदचा वार निवडून महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन पथक मोहीम राबवते. त्या दिवशी बाजार, बाजारातील बहुतांश दुकाने बंद असतात, विक्रेतेही नसतात, त्या दिवशी कारवाई करण्यातून नेमके काय साध्य होते? असा सवाल करत विक्रेते व महापालिकेचे अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यापूर्वीच त्याची टिप फेरीवाल्यांना लागते, त्यामुळे ते तेथून निघून जातात. रस्त्यावरील विक्रेत्यांकडून बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना दमदाटी ही केली जाते. कोट्यवधीची गुंतवणूक करून उभे केलेले शोरूम शोरूम समोरच मांडून विकणारे विक्रेते असे अतिशय विदारक चित्र बाजारपेठेत पाहायला मिळते. त्याला कंटाळून अनेक व्यापार्यांनी सावेडी, केडगाव उपनगरांमध्ये स्वतंत्र शाखा सुरु करण्यास सुरुवात केली आहे. अशी परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात शहराचे मुख्य बाजारपेठ नावापुरती करण्याची शक्यता आहे. हे चित्र बदलण्यासाठी धाडसी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.</em></p>