अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात यंदा वरूण राजाने शेतकर्यांना चांगले दिवस आणले आहे. अनेक वर्षानंतर जिल्ह्यात खरिपाच्या पहिल्या टप्प्यात आणि जून महिन्यांत पावसाची सरासरी 35 ते 40 टक्के आहे. यामुळे जिल्ह्यात हंगामाच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 4 लाख 24 हजार हेक्टरवर म्हणजेच 94.81 टक्के पेरणी झाली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास यंदा खरीप हंगामचे क्षेत्र वाढणार आहे.
जिल्ह्यात दरवर्षी 15 जूननंतर मान्सून दाखल झाल्यानंतर कमी- अधिक प्रमाणात वरूण राजाची कृपा होत असते. त्यानंतर हळूहळू पेरण्याला सुरूवात होवून हे काम ऑगस्टपर्यंत सुरू असते. यंदा मात्र, करोना संसर्गाचा फटका असतांना केवळ वरूण राजाच्या कृपेमुळे ग्रामीण भागाचे अर्थचक्र पावसामुळे फिरण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात जून महिन्यात जवळपास 95 टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. यात कडधान्य पिकाच्या पेरण्या या 100 ते 250 टक्के अधिक झालेल्या आहेत.