
राहाता (तालुका प्रतिनिधी)
गुरुवारी झालेल्या पावसाने गोदावरीतील विसर्ग ८०७ क्युसेक वरुन ४७६९ क्युसेकने करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या १०-१२ दिवसांपासुन कमी झालेला विसर्ग पुन्हा वाढला आहे.
नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून अवघा २५० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. वालदेवीतून ६५ क्युसेक, पालखेड मधुन ४०५ क्युसेक विसर्ग सुरु आहे. तर होळकर ब्रिज जवळ १८१ क्युसेकने विसर्ग मिळत होता. निफाड भागातील पावसाने नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात पाण्याची आवक वाढल्याने गोदावरीतील विसर्ग वाढविण्यात आला आहे.
काल दिवसभरात हालक्या स्वरुपाचा पाउस अधुन मधून पडत होता. काल सकाळी सहा पर्यंत मागील २४ तासात दारणा च्या भिंतीजवळ ७ मिमी, इगतपुरीला १० मिमी, भावलीला २८ मिमी, कडवा १० मिमी, पालखेड २८ मिमी, मधमेश्वर बंधाऱ्याजवळ ३१ मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक ला ७५ मिमी, गंगापूरला ४ मिमी, त्र्यंबकला ५८ मिमी, अंबोलीला १९ मिमी, असा पाऊस झाला.
काल गोदावरीत ४७६९ क्युसेकने विसर्ग सोडणे सुरु होते. काल सकाळी ६ पर्यंत गोदावरीतून एकूण ४७.४ टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला. खाली जायकवाडीतून विद्युत प्रकल्पातील १५८९ क्युसेक विसर्ग वगळता धरणाचे गेट तीन दिवसांपूर्वीच बंद करण्यात आले आहेत.
काल सकाळी ६ वाजता संपलेल्या मागील २४ तासात गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील पाऊस असा- कोपरगाव २९ मिमी, पढेगाव ४ मिमी, सोनेवाडी २६ मिमी, शिर्डी ३० मिमी, राहाता ४५ मिमी, रांजणगाव ४० मिमी, चितळी ५ मिमी. असा पाउस नोंदला गेला.
अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे त्याचा प्रभाव दि. ५ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत अहमदनगर, नाशिक तसेच घाटमाथा भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे. विशेषतः दि. ९ ते १२ ऑगस्ट या दरम्यान जोरदार पर्ज्यन्यवृष्टी होणार आहे. त्यामुळे भुजलपातळी निश्चितपणे वाढणार आहे.. दि. ५ ते दि. ८ ऑगस्ट या कालावधीत अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात काही ठराविक भागात काही काळासाठी जोरदार पाऊस पडेल. दि. १३ नंतर कमी दाबाचा पट्टा गुजरातच्या दिशेने जाणार असल्याने पाऊस कमी होत जाईल. दि. ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान अरबी समुद्र कोकणपट्टी व मुंबई भागात वाऱ्याचा वेग ताशी ५० किमी च्या दरम्यान असल्याने घाटमाथा भागात मुसळधार वृष्टी होईल. धरणातील आवक वाढून नदीपात्रातातील पाणी पातळीत वाढ होईल. या पावसामुळे नगर नाशिक जिल्ह्यातील जो भाग पर्ज्यन्यछायेत आहे आणि कमी पाऊस झालेला आहे, त्याभागात हा पाऊस निश्चित लाभदायी ठरेल. ऑगस्टचा उर्वरीत कालखंड आणि सप्टेंबर महिन्यात सुध्दा काही काळ जोरदार पर्ज्यन्यवृष्टी होणार आहे. नगर, नाशिक व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या अन्य भागातही अशीच परिस्थिती राहिल.
उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग