<p><strong>अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar</strong></p><p>महामार्ग तसेच बायपास रोडवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई व टाळाटाळ विरोधात </p>.<p>भाजप नगर तालुक्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. अखेर लेखी आश्वासनंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले.</p><p>या आंदोलनात नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, जेष्ठनेते रमेश पिंपळे, तालुका सरचिटणीस बाप्पूसाहेब बेरड, गणेश भालसिंग, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गहिले, पोपटराव शेळके, किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष महेश लांडगे, तालुका कोषाध्यक्ष गोवर्धन शेवाळे, सागर भोपे, चिटणीस विक्रम पालवे, गणिनीनाथ कांबळे, सुनील म्हस्के, निलेश दरेकर, शिवाजी बेरड, विजय गाडे, स्वप्निल मोरे, राहुल गुंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.</p><p>यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले की, पावसाळा सुरु झाल्यापासून सोलापूर, मनमाड, जामखेड, औरंगाबाद, पाथर्डी सह बायपास रोडची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. रोडवर अत्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असून, पाऊस सुरु असताना ग्रामीण भागातील दोन चाकी वाहन चालकांना कसरत करून वाहन चालवावी लागतात. </p><p>वाहन चालकाने समोरून येणारे वाहन बघायचे की खड्डा आला की नाही यावर लक्ष ठेवायचे? यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये या रोडवरील खड्डे दिसून न आल्यामुळे वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटून नकळत छोटे मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.</p><p>काही जणांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झालेल्या आहेत. अश्या प्रकारचे अपघात घडून त्यातून काही विपरीत घडल्यास यास कोण जबाबदार राहणार? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला.</p><p>15 दिवसाच्या आत मुरुम टाकून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी ए. एम. कडूस यांनी लेखी आश्वासन दिले. या लेखी आश्वासनाने तात्पुरत्या स्वरुपात आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र लेखी आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास ग्रामस्थांसह सर्व प्रमुख महामार्गावर रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा मनोज कोकाटे यांनी दिला आहे.</p>