संगमनेर (प्रतिनिधी) -
परतीच्या पावसाने राज्यात अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील नुकसानग्रस्त
शेतकर्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, अशा सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिले असून काल इंद्रजित भाऊ थोरात यांनी पठार भागात शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
पठार भागातील वरवंडी, खांबा, कौठे मलकापूर, बिरेवाडी, साकूर, जांबूत बुद्रुक, जांबुत खुर्द या गावांमध्ये इंद्रजीत भाऊ थोरात यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर, सभापती सौ. मीराताई शेटे, उपसभापती नवनाथ अरगडे, इंद्रजीत खेमनर, किरण मिंडे, पांडुरंग सागर यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी इंद्रजीत थोरात म्हणाले की, परतीच्या पावसाने अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. मात्र राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार शेतकर्यांना मदत देण्यासाठी काम करत असून महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तूर, सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांचे मोठे नुकसान झाले असून या सर्वांचे तातडीने पंचनामे करण्यात येणार आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकार या नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने जास्तीत जास्त मदत करणार असल्याचेही ते म्हणाले.
तर सभापती शंकर पाटील म्हणाले की, पठार भागात अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून नामदार बाळासाहेब थोरात यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असल्याने शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळत आहेत. इंद्रजीतभाऊ थोरात व प्रशासनाने विविध शेतकर्यांच्या बांधावर जाऊन आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी तहसीलदार अमोल निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.