परतीच्या पावसाने झालेल्या पीक नुकसानीची तातडीने भरपाई द्या

किसान सभेची मागणी
परतीच्या पावसाने झालेल्या पीक नुकसानीची तातडीने भरपाई द्या

अकोले |प्रतिनिधी| Akole

परतीच्या पावसाने राज्यात शेतकर्‍यांच्या तयार पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. राज्य सरकारने

या पार्श्वभूमीवर तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना मदत करत नुकसानीची रास्त भरपाई द्यावी. एकरी किमान 50 हजार रुपये भरपाई देऊन शेतकर्‍यांना तातडीने दिलासा द्यावा. केंद्र सरकारने सुद्धा शेतकर्‍यांवरील या संकटाच्या काळात तातडीने केंद्रीय पथक पाठवावे व शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी आपत्ती सहाय्यता निधीतून राज्य सरकारला पुरेशी मदत उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी किसान सभेने केली आहे.

कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यात कापूस, पश्चिम महाराष्ट्रात ऊस व द्राक्ष पिकांचे तर कोकणात भाताचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील एकूण लागवडीपैकी 30 टक्के पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शेतातील साचलेले पाणी व वाहून गेलेली शेती यांच्या नुकसानीची रास्त नोंद व्हावी यासाठी पंचनाम्यांची गती वाढविण्याची आवश्यकता आहे. शिवाय पंतप्रधान पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकर्‍यांना मिळेल यासाठी सुध्दा सरकारी यंत्रणांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या कृषी विभागाने याबाबत अत्यंत सतर्कतेने कार्यवाही करावी ,अशी मागणी किसान सभेने केली आहे.

पीक विमा योजने अंतर्गत भरपाई मिळावी यासाठी शेतकर्‍यांनी मोबाईल अ‍ॅप द्वारे नुकसानीची माहिती विमा कंपनीला द्यावी. मोबाईल सुविधा उपलब्ध नसल्यास कृषी विभाग, विमा कंपनीचे ऑफिस किंवा बँकेत अर्जाच्या विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रे जोडून भरपाईसाठी दावा करावा.

शेतकर्‍यांना याबाबत मदत व्हावी यासाठी किसान सभेने राज्यभर सहाय्यता केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून शेतकर्‍यांनी यासाठी किसान सभेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा, असे आवाहन किसान सभेच्यावतीने डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ.अजित नवले आदींनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com