नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माजी मंत्री आ. शंकरराव गडाख यांनी केली आहे. गडाख यांनी दि.4 रोजी तालुक्यातील शेतकर्यांसह नेवासाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
या निवेदनात म्हंटले आहे की, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात नेवासा तालुक्यातील गोधेगाव, बहिरवाडी, धामोरी, प्रवरासंगम, सुरेगाव गंगा, भालगाव, उस्थळ खालसा, बोरगाव, जळके खुर्द, जळके बुद्रुक, वरखेड, शिरसगाव, पाचेगाव, घोगरगाव, मंगळापुर, खेडलेकाजळी या गावासह नेवासा तालुक्यातील आठही महसूल मंडलात जोरदार पाऊस होऊन पिके पाण्याखाली गेली आहेत कपाशी, तूर, सोयाबीन, कांदा, बाजरी, भुईमूग, आदी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. जागो जागी जमीन शेवाळली आहे. तसेच अनेक ठिकाणी मातीही वाहून गेली आहे.
24 तासात 65 मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तरच अतिवृष्टी हा नियम वस्तुनिष्ठ नाही. त्यासह पीक विमा कंपन्यांकडून नुकसान झालेल्या पिकांचे फोटो अपलोड करणे, टोल फ्री नंबरवर तक्रार करणे यासह इतर जाचक अटी या शेतकर्यांच्या दृष्टीने अडचणीच्या आहेत. यावर तातडीने कार्यवाही करून नेवासा तालुक्यातील गावा गावांत शेती पिकांचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत. तसेच महसूल व कृषी विभाग यांनी गाव गावात पिकांची पाहणी करावी व पंचनामे करतांना त्यात कुठलाही दुजाभाव करू नये शेतकर्यांना मदत मिळावी.
या पद्धतीने पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल पीक विमा कंपन्यांनाही पाठवावा व शासनाच्या मदतीबरोबरच पीक विमा कंपन्यांकडूनही शेतकर्यांना मदत मिळवून द्यावी व शेतकर्यांना आधार द्यावा अशी मागणी आ. शंकरराव गडाख यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार रुपेशकुमार सुराणा नेवासा यांचेकडे केली आहे.
या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी श्रीरामपूर विलास नलगे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, बाळासाहेब शिंदे, दिगंबर नांदे, दत्तात्रय तुवर, काकासाहेब गायके आदी उपस्थित होते.