अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यात शनिवारी झालेल्या अवकाळी आणि गारपिटीचा 6 हजार 928 शेतकर्यांना तडाखा बसला आहे.
या गारपिटीमुळे पाच तालुक्यातील 45 गावातील 4 हजार 430 हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले असून यात प्राथमिक अहवालानूसार 1 कोटी 46 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. नुकसानीचा आकडा हा केवळ दोनच तालुक्यातील असल्याने तो वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शनिवारी दुपारी आणि सायंकाळी संगमनेर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी आणि नेवासा तालुक्यात अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा बसला. यात शेवगाव तालुक्यातील दहा गावात विविध शेती पिकांचे नुकसान झाले असून एक शेळी आणि एक पिल्लू वीज पडून मृत्यूमुखी पडले आहे.
संगमनेर तालुक्यातील पाच गावात 878 शेतकर्यांचे 357 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 49 कोटी 41 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यात गहू, कांदा, टॅमेटो, चारापिके, डाळींब, कांदा, भाजीपाला, विविध फळबागा यांचे नुकसान झालेले आहे.
पाथर्डी तालुक्यातील 24 गावातील 307 हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे 55 लाख 24 हजार 200 रुपयाचे नुकसान झालेले आहे. राहुरी तालुक्यातील 4 गावात 6 हजार 50 शेतकर्यांचे 3 हजार 730 हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झालेले आहे.
तर नेवासा तालुक्यातील दोन गावातील शेतकर्यांचे 36 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांची संख्या, बाधित क्षेत्र, एकूण रक्कम यांचा तपशील वाढणार आहे. आज जिल्ह्यातील एकूण नुकसानीची आकडेवारी समोर येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.