
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिर्डीत पार पडलेल्या दोन दिवसांची नवसंकल्प कार्यशाळेत राजकीय, सामाजिक मुद्यांसह विविध मुद्यांचा सखोल उहापोह करण्यात आला. या शिबिरात सर्व पदाधिकार्यांनी त्यांची मते मांडली व त्यातून एक महत्वाचा दस्तावेज तयार झाला आहे. हा दस्तावेज जाहीरनाम्यासह विविध योजना राबवण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे.
काँग्रेस पक्ष लोकशाहीला माननारा पक्ष असल्याने या शिबिरात सर्व पदाधिकार्यांनी मोकळेपणाने व स्पष्टपणे मते मांडली व ती मते विचारात घेण्यात आली. अशा पद्धतीची लोकशाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे का ? असा सवाल विचारत, ते फक्त आदेश देण्याचे काम करतात, असे प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेची सांगता शिर्डीतील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात झाली, यावेळी पाटील बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
समारोपप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, दोन दिवसाच्या या शिबिरात उदयपूर घोषणापत्राची अमंलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून एक व्यक्ती एक पद नियमानुसार या शिबिरात 51 पदाधिकार्यांनी राजीनामे दिले असून ही पक्रिया पुढेही चालूच राहणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शिर्डी कार्यशाळेतील दोन दिवसाच्या मंथनातून जे सार निघाले आहे त्याचे एक दिशादर्शक पुस्तक बनू शकते.
आता याची अंमलबजाणी करायची आहे. 100 दिवसांचा कार्यक्रम बनवावा लागणार आहेत. त्यानंतर त्याचा उपयोग आमागी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निश्रि्चतच होईल. हे अधिवेशन काँग्रेससाठी लाभदायी ठरले तसेच हे अधिवेशनही काँग्रेस पक्षाला फलदायी ठरेल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.