अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
परतीच्या पावसाने शेतकर्यांची पिके उद्ध्वस्त झाल्याने प्रचंड नुकसान झाले असून शेतकर्यांचा आर्थिक कणा मोडून गेला आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी मदतीची ग्वाही दिली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून त्यात या मदतीचा निर्णय होण्याची शक्यता असल्याने या निर्णयाकडे नगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकर्यांच्या नजरा लागून आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुडगूस सुरू आहे. यात सोयाबीन, कापूस, बाजरी,मका व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पहाणी दौरा केला. तसेच त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून हेक्टरी किती मदत द्यावयाची याबाबत चर्चा होणार आहे.