शासनाचे निर्देश, निर्बंध कायम ठेवत होणार स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

शासनाचे निर्देश, निर्बंध कायम ठेवत होणार स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 74 वा वर्धापन दिन 15 ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. करोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता राज्यात ब्रेक-द-चेन अंतर्गत शासनाने 4 जून रोजी आदेश पारित केले आहे. गत वर्षीप्रमाणेच यावर्षीही राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्वतंत्र आदेश देण्यात येत आहेत.

राज्यात सर्व विभागीय, जिल्हा, उप विभागीय, तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती व कोकण यांनी विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे.पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाचवेळी सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. सदर दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 वा. या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येणार नाही. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वा. च्या पूर्वी किंवा 9.35 वा. च्या नंतर आयोजित करावा. यावेळी करण्यात येणार्‍या भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विषद करणारे तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता याकरिता कार्य करण्यासाठी प्रेरित करणारे असावे.

ध्वजारोहण करणारे मा. मंत्री, राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी वेळेवर पोहचू शकणार नसल्यास विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकार्‍यांनी ध्वजारोहण करून ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडावा. संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गाव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील.

स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच करोना योध्दा जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रीत करावे. करोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता, स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून आयोजित करण्यात येणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल, आयोजकांनी त्यानुसार मान्यवरांना निमंत्रित करण्याची कार्यवाही करावी. समारंभास उपस्थित राहणार्‍या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित अंतराच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करावे व अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करावे.

या कार्यक्रमातून व सोशल मीडियाद्वारे आत्मनिर्भर भारत या घोषणेचा प्रसार करावा. दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, आंतर शालेय/आंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पध्दतीद्वारे वाद-विवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धाचे आयोजन करावे. महत्त्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा, सोशल मीडियाद्वारे निवडक विद्यार्थी, विद्यार्थिनींचे देशभक्तीपर गाणे, भाषणे आयोजित करावीत. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी.वेबिनार आयोजित करावा, एनएसएस व एनवायकेएसद्वारे देशभक्तीपर मोहीम राबविण्यात यावी. तसेच सोशल मीडिया व डिजीटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा. संदेश द्यावा, नागरिकांनी घराच्या बाल्कनी, गच्चीवरून राष्ट्रीय ध्वज हलविणे, याप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देखील स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी.

राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर तसेच ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावा. विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती हे त्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकार्‍यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com