राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
नाशिक जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणांमधील विसर्ग वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे नांदूरमधमेश्वर बंधार्यातून काल 9 वाजता गोदावरीत 31849 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे गोदावरी पात्र पुन्हा दूथडी भरुन वाहू लागले आहे.
काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या पाणलोटात इगतपुरी भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. काल दिवसभरात गंगापूरच्या पाणलोटात पावसाची संततधार सुरू होती. सर्व धरणे फुल्ल भरलेली आहेत. त्यामुळे धुव्वाधार पावसाने पुन्हा नवीन पाणी दाखल होत असल्याने धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत. गंगापूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले.
सुरुवातीला 268 क्युसेकने, त्यानंतर रात्री 8 वाजता 1500 क्युसेकने तर रात्री उशीरा 9 वाजता 2500 क्युसेक पर्यंत वाढविण्यात आला. दारणाचा विसर्ग काल सकाळी 6 वाजता 10560 क्युसेक इतका होता. तो नंतर कमी कमी होत जाऊन काल रात्री 8 वाजता 5924 क्युसेक पर्यंत कमी करण्यात आला. मुकणेतून 363 क्युसेक, कडवातून 4959 क्युसेक, वालदेवीतून 183 क्युसेक इतका होता.वालदेवीतुन 183 क्युसेक, आळंदी 30 क्युसेक, भोजापूर 2800 क्युसेक, पालखेड मधुन 1272 क्युसेक असा करण्यात आला. वरील धरणांमधुन पाण्याची आवक वाढत असल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्यातून काल रात्री 31849 क्युसेक इतका सुरु होता. गोदावरी पात्र पुन्हा दुथडी भरुन वाहु लागले आहे. काल सकाळी 6 पर्यंत गोदावरीत नांदूरमधमेश्वर बंधार्यात एकूण 83.7 टीएमसी पाण्याचा एकूण विसर्ग जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला आहे.