गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 29.17 कोटींची निविदा प्रसिद्ध - आ. काळे

गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 29.17 कोटींची निविदा प्रसिद्ध - आ. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

महाविकास आघाडी सरकार असताना आपण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 300 कोटी निधी रुपये मंजूर करून घेतला आहे. त्यापैकी आजपर्यंत 72 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

त्यापैकी पहिल्या टप्यातील 36 कोटींची कालव्यांची दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर असून उर्वरित कामांच्या निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध कराव्यात यासाठी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याची पाटबंधारे विभागाने दखल घेऊन गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 29.17 कोटीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.

ब्रिटीश काळात निर्मिती झालेल्या गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे 100 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या कालव्यांची वहन क्षमता कमी होऊन त्याचा परिणाम सिंचन व आवर्तनावर अवलंबून असणार्‍या विविध पाणी पुरवठा योजनांवर होत होता. दुरवस्थेमुळे वारंवार कालवे फुटत होते व पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. वहन क्षमता कमी झाल्यामुळे सिंचनासाठी शेतकर्‍यांना पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळत नव्हते. पर्यायाने शेतीच्या उत्पन्नावर दुष्परिणाम होऊन शेतकर्‍यांचे नुकसान होत होते. त्यामुळे कालवे दुरुस्तीचा विषय ऐरणीवर आला होता.

त्याची दखल घेऊन आ. आशुतोष काळे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी निवडून आल्यापासून पाठपुरावा करून महाविकास आघाडी सरकारकडून 300 कोटींचा निधी मिळविला आहे. या निधीतून आजवर 36 कोटींची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. उर्वरित कामांच्या निविदा देखील तातडीने प्रसिद्ध कराव्यात यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता.

त्या पाठपुराव्यातून पाटबंधारे विभागाने गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 29.17 कोटीच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. लवकरच या निविदांना मंजुरी मिळून डाव्या-उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीचे काम वेगाने होण्यास मदत होऊन लाभधारक शेतकर्‍यांच्या व आवर्तनावर असणार्‍या असंख्य पाणीपुरवठा योजनांना येणार्‍या अडचणी दूर होणार आहेत. त्यामुळे लाभधारक शेतकर्‍यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com