
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
गोदावरी लाभक्षेत्रात रब्बी हंगामाकरिता 1 जानेवारीपासून आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. उन्हाळी हंगामातील 3 आवर्तनाचे नियोजन मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत करण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक नागपूर येथे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस आ. माणिकराव कोकाटे, आ. दिलीप बनकर, आ. लहु कानडे, आ. आशुतोष काळे, कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपअभियंता महेश गायकवाड, उपअभियंता सुभाष मिसाळ आदी उपस्थित होते.
ही बैठकीत गोदावरी धरण समुहातील असलेल्या पाणीसाठ्याचा आढावा अधिकार्यांनी सादर केला. यंदाच्या वर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने लाभक्षेत्रातील शेती आणि फळबागांसाठी अद्यापही पाण्याची मागणी होत नसल्याचे अधिकार्यांनी निदर्शनास आणून दिले. तरीही चालू रब्बी हंगामात एक आवर्तन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सदर आवर्तन 1 जानेवारीपासून सुरु करण्याच्या सूचना ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत.
उन्हाळी हंगामाचे नियोजनही गांभिर्यपूर्वक करण्याचे सुचीत करुन ना. विखे पाटील यांनी उन्हाळी हंगामातील 3 आवर्तनांचे वेळापत्रक निश्चित करावे, असे बैठकीत सांगितले. झालेल्या निर्णयाप्रमाणे लाभक्षेत्राला मार्च, एप्रिल आणि मे महिन्या दरम्यान एक आवर्तन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आवर्तनापूर्वी चार्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याकरिता अधिकारी कर्मचार्यांनी गांभिर्याने काम करावे, असे निर्देश देतानाच कर्मचार्यांची संख्या कमी असल्यास याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावा. तसेच 7 ते 55 किमी पर्यंत माती कामाकरिता शेरे पुर्तता करुन, शासनाकडे अंदाजपत्रक तातडीने पाठवावे. जेणेकरुन कालव्यांची वहनक्षमता मर्यादीत राहून पाण्याचा विसर्ग 550 ते 750 क्सुसेस पर्यंत होईल. यादृष्टीने तातडीने विभागातील अधिकार्यांनी कार्यवाही करावी, असे मंत्री विखे पाटील बैठकीत निर्देश दिले.