माळवाडगांव |वार्ताहर| Malvadgav
या खरिपातील सोयाबीन पिकाचे शेंगा परिपक्व होण्याचे आतच कोवळ्या शेंगाच्या अवस्थेत पिकांवर बुरशीजन्य रोगांमुळे पाने पिवळी पडून पानगळ व शेंगावर ठिपके दिसू लागल्याने या किडीच्या संकटामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अगोदरच कांदा, मिरची, टोमॅटो, सिमला मिरची या शेतमालाला बाजारभाव नाहीत. आज नव्याने निघणारे सोयाबीनचे दर तेजीत दिसताहेत.
परंतू काढणी हंगाम सुरू होताच भाव कोसळणार असल्याची जाणीव शेतकर्यांना आहे. शेतकर्यांनी किटक नाशक फवारणी केलेली असतानाही बाजारभावाची चिंता न करणारा शेतकरी या बुरशी रोगाचे चिंतेने त्रस्त झाला आहे. कृषीतज्ञाचे म्हणणे आहे की, सोयाबीन शेंग अवस्थेत असताना पिकास पाण्याची अथवा जमिनीत भरमसाठ ओलाव्याची गरज असते. बागायत सोयाबीनवर या रोगाचे प्रमाण कमी असून जिरायत सोयाबीन पिकावर सर्वाधिक आहे.
पाण्याचा ताण पडल्यावर हा बुरशीजन्य रोग मुळापासून वरती पानासह शेंगावर प्रादुर्भाव करतो. या रोगानें पछाडलेल्या सोयाबीनचे चित्र काढणीस आल्याप्रमाणे दिसते. प्रत्यक्षात साठ दिवसाचे पीक कोवळेच आहे. कुणी एकच तर कुणी दोन दोन किटकनाशक फवारणी केली आहे. आता फवारणीचा खर्च पेलावणारा नसल्याने बहुतांश शेतकर्यांनी फवारणीचा नाद सोडून दिला आहे.