अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत मोफत जागांसाठी 25 टक्के प्रवेशासाठी पालकांसाठी 17 तारखेपासून दुपारी 4 वाजेपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुसरू आहे. जिल्ह्यात मोफत प्रवेशासाठी 400 शाळा पात्र असून त्या ठिकाणी 3 हजार 48 विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेशाची क्षमता आहे. यासह 40 पूर्व प्राथमिक शाळा देखील पात्र असून त्यात 10 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश घेता येणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये राज्यामध्ये 1 एप्रिल 2010 पासून अंमलात आला आहे. या अधिनियमांतर्गत शासन अधिसुचना 11 ऑक्टोंबर 2011 अन्वये तयार केलेले नियम लागू करण्यात आलेले आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये किमान 25 टक्के प्रवेश ठेवण्याची तरतुद आहे. तसेच अशा प्रवेशित बालकांचे प्राथमिक शिक्षणाच्या खर्चाची प्रतिपुर्ती वेळोवेळी निश्चित केलेल्या दराप्रमाणे करण्याची तरतुद आहे.
शिक्षण हक्क कायदयाअंतर्गत आर्थिक, सामाजिक दूर्बल घटक तसेच विधवा, घटस्फोटित, अनाथ व दिव्यांग बालकांना दर्जेदार शाळेत मोफत प्रवेश घेता येणार आहे. पालकांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात इंग्रजी, उर्दू व मराठी माध्यमाच्या शाळांवर मदत केंद्राची स्थापना करुन या मदत केंद्राच्या माध्यमातून पालकांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. तालुकानिहाय मदत केंद्राची यादी संकेत स्थळावर जाहीर करण्यात आली आहे. मदत केंद्रावर अर्ज पूर्णपणे मोफत भरण्यात येतात. तसेच ज्या पालकांना अर्ज ऑनलाईन भरणे शक्य नाही, अशा पालकांनी अँपव्दारेही ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
पालकांच्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत काही तक्रारी असतील तर अशा तक्रारीचे निरसन करण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 25 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2022 या कालावधी जिल्ह्यातील 25 टक्के पात्र सर्व शाळांची नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच या वर्षाची 25 टक्के कोट्यातील प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पध्दतीने होणार असून पालकांनी अर्ज करुन देण्यात आलेले आहे. पालकांनस ऑनलाईन अर्ज 17 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत भरता येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटिल यांनी दिली.
तालुकानिहाय शाळा आणि कंसात क्षमता
अकाले 13 (115), जामखेड 12 (55), कोपरगाव 24 (247), कर्जत 19 (117), नगर 53 (301), नेवासा 31 (220), पारनेर 29 (153), पाथर्डी 22 (136), राहुरी 29 (280), राहाता 36 (385), शेवगाव 34 (200), संगमनेर 34 (286), श्रीगोंदा 19 (83), श्रीरामपूर 26 (193), मनपा 27 (277) असे आहेत.