
कोपरगाव (प्रतिनिधी) -
माजी आमदारांनी नुकतीच अर्धवट माहितीच्या आधारे पाणी पुरवठा योजनांचा वीज प्रवाह खंडित केल्याचे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करून
तालुक्याचे आमदार काय करतात असा प्रश्न विचारला आहे. त्याबाबत तालुक्याच्या माजी लोकप्रतिनिधींना माझे एवढेच सांगणे आहे की, आपण 17 पाणी पुरवठा योजनांचे वीजप्रवाह खंडित केल्याची व पाणीपुरवठा बंद झाल्याची प्रसिद्ध केलेली बातमी हि पूर्णत: चुकीची आहे. त्याबाबत आपण सविस्तर माहिती घ्या. अर्धवट माहितीच्या आधारे बोलू नका असा सल्ला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना दिला आहे.
सुधाकर रोहोम यांनी म्हटले आहे, तालुक्याच्या माजी आमदारांना अर्धवट माहिती मिळाली आहे. तालुक्यातील 17 पाणी पुरवठा योजनांचे वीजबिल थकल्यामुळे वीजप्रवाह खंडित केल्याचे व पाणी पुरवठा बंद झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. येसगाव, अंचलगाव, माहेगाव देशमुख, कुंभारी, हिंगणी, करंजी, मळेगाव थडी, कारवाडी, मंजूर, वेळापूर, चासनळी, हंडेवाडी, कोळगाव थडी, वडगाव, सडे, धोंडेवाडी आदी 16 गावातील 13 गावांचा पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु आहे. यापैकी वडगाव, सडे पाणी योजनांचा दोन दिवसांपूर्वी व धोंडेवाडी पाणी योजनेचा बारा दिवसांपूर्वी वीजप्रवाह खंडीत करण्यात आला आहे. त्याबाबत नियोजन करून या योजनांचा वीजप्रवाह सुरळीत होईल.
आमदार आशुतोष काळे काय करताय हे तालुक्याच्या जनतेला दिसतेय. त्याचा प्रत्यय नुकताच कोपरगाव शहरातील नागरिकांना आला असून शहर विकासात खीळ घालण्यासाठी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नामंजूर केलेल्या विकासकामांच्या निविदा आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हाधिकार्यांनी मंजूर केल्या आहेत. त्यामुळे आपण काय करतोय याचे मूल्यमापन करा व पूर्ण माहिती घेवूनच वक्तव्य करावे. - सुधाकर रोहोम.