केवळ पंचनाम्याची कागदपत्रे रंगवू नका, शेतकर्‍यांना पैसे द्या

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी
केवळ पंचनाम्याची कागदपत्रे रंगवू नका, शेतकर्‍यांना पैसे द्या

कोपरगाव (प्रतिनिधी) -

तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांना पुन्हा एकदा वादळी वार्‍याचा व अतिवृष्टीचा तडाखा बसला. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे

हिरावला गेला, डोळ्यादेखत उभी पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकर्‍यांपुढे मोठे आर्थीक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत केवळ पंचनामे करून कागदपत्रे रंगविण्यापेक्षा शेतकर्‍यांना तातडीने आर्थीक मदत करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांचेकडे केली आहे.

तालुक्यातील खोपडी, लौकी, कान्हेगाव, संवत्सर, भोजडे, धोत्रे, आपेगाव, कासली, शिरसगाव, गोधेगाव, दहेगाव बोलका, पढेगाव, करंजी, खिर्डीगणेश आदी गावांना अतिवृष्टी आणि वादळाचा मोठा तडाखा बसला, कापूस, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांबरोबर ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीची पहाणी सौ. कोल्हे यांनी केली. त्यांचेसमवेत शरदराव थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम होते. सोंगणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वारंवार आलेल्या संकटाला तोंड देत त्यातून स्वतःला सावरत, आर्थीक तरतूद करत पीके उभी केली होती.

सध्याच्या करोना परिस्थितीमुळे लॉकडाऊन काळातील पिकवलेला शेतीमालही कवडीमोल भावात विकावा लागला. मोठा आर्थिक फटका या कालावधीत शेतकर्‍यांच्या वाट्याला आला. या सर्व संकटावर मात करत उभी केलेली पिके अतिवृष्टी आणि वादळी वार्‍याने जमीन दोस्त झाली. हजारो हेक्टरवरील उभी पिके भुईसपाट झाली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

या संकटातून सावरणे कदापीही शक्य नाही. परंतु तरीही त्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी. याकरिता नेहमीप्रमाणे केवळ पंचनामे करून कागदपत्रे रंगविण्यापेक्षा त्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी सौ. कोल्हे यांनी केली आहे. ज्या शेतकर्‍यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविलेला आहे. त्यांनी झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी तालुक्याच्या कृषी कार्यालयात लेखी अर्ज सादर करावा,असे यावेळी कृषी अधिकारी यांनी सांगितले.

लाखाच्या नुकसानीपोटी हजाराचा चेक, तोही वर्ष सहा महिन्यांनी 15 दिवसांच्या अवधीनंतर हातात येणारा घास डोळयादेखत जमीनदोस्त होतो, गेल्या चार महिन्यांपासून जीव ओतून जोपासना केली, जोमात आलेली पिके अचानक आलेल्या पावसामुळे उद्ध्वस्त होतात, चार महिन्यांच्या कष्टावर अक्षरशः पाणी फिरले. नेहमीप्रमाणे पंचनामे करण्याचा घाट घालून वर्ष, सहा महिन्यांनी लाखाच्या नुकसानापोटी हजाराचा चेक हातात येतो. ही जगाच्या पोशिंद्याची अवस्था आहे. हे सरकार शेतकर्‍यांचेच काय पण कोणाच्याच हिताचे नाही. - संतोष देशमुख, शेतकरी

मायबाप सरकारचे आमदार लोकप्रतिनिधीत्व करीत असतात, ज्यावेळी संकट येते त्यावेळी शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्याचे काम आमदारांनी करावयाचे असते. प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजे. परंतु ते काम स्नेहलता कोल्हे करत आहेत.

- घनश्याम वारकर, शेतकरी खोपडी

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com