चारा छावण्या चालकांकडून 3 कोटी 92 लाख रूपयांची होणार वसुली?

महालेखापालांच्या ऑडीटनंतर सर्वांना नोटीसा
चारा छावण्या चालकांकडून 3 कोटी 92 लाख रूपयांची होणार वसुली?

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी\ Shrigonda

2012-13 च्या दुष्काळात देयके सादर न करणार्‍या चारा छावण्या चालकांकडून 3 कोटी 92 लाख रुपयांची वसुली करण्याबाबत महालेखापाल यांच्या ऑडीटनंतर छावणी चालकसंस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

राज्यामध्ये 2012-13 या सालात दुष्काळजन्य स्थिती होती. प्रामुख्याने जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने राज्यभरात विविध ठिकाणी शासनाच्या मंजुरीनुसार चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. श्रीगोंदा तालुक्यातही विविध संस्थेमार्फत चारा छावण्या चालविण्यात आल्या होत्या. याबाबत राज्याचे महालेखापाल यांच्या पथकाने 1 जून 2006 ते 28 फेब्रुवारी 2015 या कालावधीतील केलेल्या लेखापरिक्षणामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.

या त्रुटीमध्ये जनावरांसाठी शेड, गोठे करण्यासाठी प्रती जनावरे पाच आणि दोन रुपये खर्च दाखवण्यात आला. तो छावणी चालकांना शासनाकडून आदा करण्यात आला होता. मात्र याबाबत संस्थांनी देयके दाखल केले नसल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील छावणी चालकांनी ही देयके सादर न केल्यास तब्बल 3 कोटी 92 लाख 31 हजार 200 रुपये वसुली करण्यात येणार असल्याचे नोटिसामध्ये म्हटले आहे.

श्रीगोंदा तालुक्यात तत्कालीन परिस्थितीत या छावण्यांमध्ये अनेक विषय वादग्रस्त ठरले होते. असे असले तरी यानंतर अनेक विषय जागेवर दुरूस्त करण्यात आले होते. मात्र आता तब्बल दहा वर्षांनंतर या छावणी चालकांना श्रीगोंदा तहसील कार्यालयामार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

देयकांबाबत दिलासाही

लेखापरीक्षण मध्ये अभिप्राय नोंदविलेले आहेत त्यानुसार सबंधीत कालावधीत चालविलेल्या चारा छावणीचे शेड या बाबीवर करण्यात आलेल्या खर्चाची देयके ही नोटीस मिळाल्यापासून तात्काळ तहसील कार्यालयात सादर करावीत. अन्यथा सदर रक्कम छावणी चालकांकडून वसुल करणेकामी पुढील कायदेशीर कार्यवाही अवलंबण्यात येईल असे नोटीसीत म्हटले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com