वित्त आयोगाच्या निधीतून पाण्याचे व पथ दिव्यांचे वीज भरण्यास विरोध

राज्य कर सल्लागार एजन्सी रद्द करण्याची सरपंच परिषदेची मागणी
वित्त आयोगाच्या निधीतून पाण्याचे व पथ दिव्यांचे वीज भरण्यास विरोध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

15 व्या वित्त आयोगाच्या (15 Finance Commission) रक्कमेतून पथ दिवे (Path lights) व पाणी पुरवठा योजनेचे बिल (Water supply scheme bill) भरणे, तसेच ग्रामपंचायतीसाठी शासनाने कर सल्ल्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सी ऐवजी स्थानिक कर सल्लागार यांच्याकडूनच ही कामे करून घ्यावीत व शासन नियुक्त एजन्सीचे काम रद्द करण्यात यावे, अशी मागणी सरपंच परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांच्याकडे करण्यात आली.

गावाच्या शाश्वत विकासासाठी 15 व्या वित्त आयोगाची रक्कम खर्च होणे अपेक्षित आहे. ग्रामपंचायत ग्रामसभेतील निर्णयानुसार व गावातील गरजेनुसार हा निधी खर्च होणे गरजेचे आहे. मात्र, वित्त आयोगाचा हप्ता ग्रामपंचायतींना जमा झाला की, शासन वेगवेगळे परिपत्रके काढून हा निधी खर्च करण्याच्या सूचना देत आहे. आता तर पथ दिवे बिल (Path lights) हे वित्त आयोगातून भरावे असे शासन आदेश ग्रामविकास विभागाने काढले आहेत. वास्तविक यापूर्वी शासन हे बिल भरत होते. करोनाच्या काळात गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायत वसुली ठप्प आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे बिल शासनस्तरावरून माफ होणे गरजेचे आहे.

वित्त आयोगातून कम्प्युटर ऑपरेटरचे मानधन अदा करणे, विलगीकरण कक्ष स्थापन करावा, करोना निर्मूलनावर खर्च करावा, अपंगावर खर्च करावा, शाळा अंगणवाड्यावर खर्च करावा, हातपंप दुरुस्तीसाठी पैसे भरावेत, प्राथमिक शाळेचे लाईट भरावीत, कर सल्ल्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीला पैसे द्यावेत अशाप्रकारे नवनवीन अध्यादेश काढून केंद्र सरकारकडून थेट ग्रामपंचायतीला मिळणार्‍या वित्त आयोगाच्या रक्कमेला कात्री लावण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या 100 टक्के रकमेतून 10 टक्के जिल्हा परिषद व 10 टक्के पंचायत समिती असे 20 टक्के कपात करून 80 टक्के निधी ग्रामपंचायतीला ठेवला आहे.

निवेदनावर परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते, प्रदेश महिला अध्यक्ष राणी पाटील, विकास जाधव यांच्यासह आगडगावचे सरपंच मच्छिंद्र कराळे, खारे कर्जुनेचे सरपंच अंकुश पाटील शेळके, दहिगावचे सरपंच मधुकर म्हस्के, निंबोडी सरपंच शंकरराव बेरड, इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे, इसळकचे सरपंच संजय गेरंगे, धनगरवाडीचे सरपंच किशोर शिकारे, अशोक लहानु विरकर यांच्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com