शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी भाजपचे प्रयत्न

आजपासून महाराष्ट्रभर निषेध दिन
File Photo
File Photo

अकोले |प्रतिनिधी| Akole

शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी सुरू असलेल्या भाजप सरकारच्या हिंस्रपणाच्या विरोधात आजपासून महात्मा गांधी यांच्या हौतात्म्य दिनी महाराष्ट्रभर निषेध दिन पाळण्यात येऊन उपोषण करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे कृषी कायदे मागे घ्यावेत व आधार भावाला कायदेशीर संरक्षण द्यावे या मागण्यांसाठी दिल्ली येथे दोन महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू आलेले शांततापूर्ण आंदोलन कुटीलपणे बदनाम करून मोडून काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. पण सरकारच्या या कारस्थानास शेतकर्‍यांचा जबरदस्त प्रतिकार होत आहे.

भाजपशी संबंधित असलेला अभिनेता दीप सिद्धू व संयुक्त किसान मोर्चाचा भाग नसलेल्या व आंदोलनात गडबड घडवून आणण्यासाठीच आंदोलनात उतरविण्यात आलेल्या किसान मजदूर संघर्ष कमिटीला हाताशी धरून भाजपच्या केंद्र सरकारने 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार घडवून आणला. लाल किल्ल्यावरही अत्यंत आक्षेपार्ह कृत्य केले.

दुसर्‍या बाजूला संयुक्त किसान मोर्चाने प्रजासत्ताक दिनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ अत्यंत शांततेत अभूतपूर्व ट्रॅक्टर मार्च काढला. एक लाख ट्रॅक्टर व सात लाख शेतकरी या ट्रॅक्टर मार्चमध्ये सहभागी झाले. भाजपच्या आय टी सेलने मात्र अत्यंत शांततेत पार पडलेल्या ट्रॅक्टर मार्चकडे देशवासीयांचे लक्ष जाऊ नये यासाठी दिल्ली येथे दीप सिद्धू, किसान मजदूर संघर्ष कमिटी आणि पोलीस यांनी घडविलेला हिंसाचार चित्रित करून तो देशभर प्रसारित केला.

शेतकर्‍यांचे दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू असलेले शांततामय आंदोलन पहिल्यांदा बदनाम करायचे व नंतर बळाचा वापर करून ते मोडून काढायचे या षडयंत्राचा भाग म्हणूनच हे सारे करण्यात आले. दुसर्‍या दिवशी या रणनीतीनुसार पलवल बॉर्डर व गाजीपूर बॉर्डरवर सरकारने पोलीस बळाचा वापर करून येथे बसलेल्या शेतकर्‍यांचे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

गाजीपूरमध्ये हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलन मोडित काढण्यासाठी हिंस्र व कुटील मार्गाचा अवलंब केला आहे. जे.एन.यु. मधील विद्यार्थ्यांचे आंदोलन व सी.ए.ए. विरोधातील दिल्ली आंदोलन सरकारने अशाच प्रकारे हिंसेचा वापर करत मोडून काढले होते. सरकार व भाजप आता शेतकर्‍यांचे आंदोलनही याच प्रकारे हाताळत आहे.

संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि अखिल भारतीय किसान सभा सरकारच्या कृतीचा धिक्कार केला आहे. महात्मा गांधी यांच्या हौतात्म्यदिनी दिनांक 30 जानेवारी 2021 रोजी देशभर एक दिवसाचा उपवास करून, सभा घेऊन, धरणी धरून शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी व समाजसेवी संघटना सरकारच्या या कारस्थानाचा जोरदार निषेध करणार आहेत.

महाराष्ट्रातही सर्वत्र अशाप्रकारे निषेध करण्याचे आवाहन संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि सर्व समविचारी संघटनांच्यावतीने डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले आदींनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com