
देवळाली प्रवरा (वार्ताहर)
ऊस दरा अभावी उदासिन झालेला शेतकरी कांदा पिकाकडे वळला खरा! पण कांदा लागवडीमुळे मजूरांची मात्र चांदी झाली आहे. सध्या सर्वत्र कांदा लागवडीची धांदल उडाली असून एकाच वेळी टाकलेली कांदा रोपं लागवडीसाठी आल्याने मोठ्याप्रमाणात मजुरांचा तूटवडा जाणवत आहे. मजूर मिळेल का? मजूर, अशी शेतकर्यांची अवस्था झाली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. या 75 वर्षात शेतीचे मोठ्याप्रमाणात आधुनिकीकरण झाले. मोटनाडा जाऊन विद्यूत मोटार आली. बैल जोडीची जागा टँक्टरने घेतली. पी.व्हि.सी.पाईप सायफन आले. ठिबक सिंचन व स्पिंग्रलर सारख्या आधुनिक सिंचन सुविधा आल्या. पेरणीयंत्र आले. गहू काढणीसाठी हार्वेस्टर आले. यातून दिवसेंदिवस शेती प्रगतीशील होत असली तरी अजूनही मोठ्याप्रमाणात शेतीला आधुनिकतेची गरज असल्याचे कांदा लागवडीतून पाहायला मिळाले.
ऑगष्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर ऑक्टोबर मध्ये जवळपास सर्वच शेतकर्यांनी कांद्याची रोप टाकली. ही रोप डिसेंबर, जानेवारीमध्ये लागवडीसाठी तयार झाली. आणि सर्वत्र कांदा लागवडीची एकच झुंब्बड उडाली. कांदा लागवडीसाठी महिला मजूर मिळत नसल्याने तसेच पंधरा-पंधरा दिवस त्यांची वाट पाहावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मजूर मिळाले तरी त्यांना जाण्या-येण्याची व्यवस्था करावी लागत आहे. यासाठी रोज पाचशे ते हजार रुपये मोजावे लागत आहेत.
कांदा लागवडीसाठी मजूरीचे वेगवेगळे दर आहेत. सरी पध्दत, वाफा पध्दत, बेड पध्दत अशा लागवडीसाठी वेगवेगळे मजुरीचे दर आहेत. म्हणजेच जाण्या-येण्याचा खर्च वेगळा. हेच दर पुढे कांदा काढणीसाठी असतात. यामुळे यंदा अनेक शेतकर्यांनी कांदा पेरणी करून केला आहे. त्याचा कांदा देखील चांगला असल्याने पुढील वर्षी कांद्यांचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. ही झाली लागवड परंतू पुढे फवारणी, खते व खुरपणी काढणी या सर्वाचा हिशोब केला तर हा खर्च एकरी 70 ते 80 हजाराच्या पुढे जात आहे.
भाव जर चांगला मिळाला तर पाच महिन्याच्या या पिकात ऊसा पेक्षा जास्त पैसे मिळतात. शिवाय कांदा निघाल्यानंतर पुढे सोयाबिन किंवा कपाशी ही पिके देखील घेता येतात. म्हणून या पिकावर जादा खर्च करण्याचे शेतकरी धाडस करत आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकर्यांनी यंदा कांदा साठवून ठेवला परंतू महिना, दिड महिन्याचा कालावधी सोडता यंदा कांदा बाराशे ते पंधराशेच्या पुढे गेला नाही. तरी या वर्षी देखील कांद्याची विक्रमी लागवड तालुक्यात झाली आहे. संक्रांती पर्यंत कांदा लागवडीची ही धांदल अशीच सुरु राहणार आहे.
साधारणपणे दहा मजूर महिला एक एकर कांदा लागवड करतात. कांदा लागवडीचा भाव पाहाता त्यांना हजार ते अकराशे रुपये रोजंदारी पडते. शिवाय जाण्या येण्याची मोफत सोय होत आहे. अशीच परिस्थिती कांदा काढणी वेळी होते.त्यामुळे कांदा लागवडीने मजूरांची चांदी झाली आहे. मजूरा अभावी शेतकर्यांची होणारी फरपट थांबण्यासाठी कृषी विद्यापिठांनी यावर संशोधन करुन यांत्रिक पध्दतीने कांदा लागवडीसाठी प्रयत्न करावेत.