वीज कोसळून शेतकर्‍याचा मृत्यू

एक जखमी: टाकळी खातगाव येथील घटना
वीज कोसळून शेतकर्‍याचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तालुक्यातील टाकळी खातगाव येथे जनावरे चारणार्‍या दोन शेतकर्‍यांवर वीज कोसळली. या दुर्घटनेमध्ये भानुदास बाबूराव शेटे (वय 62) यांचा मृत्यू झाला. तर गणपत सखाराम पिसे (वय 75) हे जखमी असून त्यांच्यावर भाळवणी (ता. पारनेर) येथील खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गुरूवारी दुपारी ही घटना घडली.

भानुदास शेटे आणि गणपत पिसे (दोघे रा. टाकळी खातगाव) हे शेळ्या चारण्याचे काम करतात. दोघेही नेहमीप्रमाणे गुरूवारी शेळ्या चारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील राजमोहम्मद शेख यांच्या गट नंबर 291 मध्ये गेले होते. सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाला दुपारी साडेतीन वाजता सुरूवात झाली. पावणे चार वाजण्याच्या सुमारास या भागात वीज कोसळून मोठा आवाज झाला.

त्यामुळे या भागातील शेतकरी वीज कोठे कोसळली, हे पाहण्यासाठी गेले. त्यावेळेस भानुदास शेटे हे वीज कोसळून मृत्यूमुखी पडले होते. गणपत पिसे हे जखमी झाले होते. पिसे यांना उपचारासाठी भाळवणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शेटे यांच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com