पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यात 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 230 बंधारे, नालाबंडिंग, गावतलाव व जलसंधारणाच्या कामांचे फुटून नुकसान झाले आहे. काही राजकीय व्यक्तींनी त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याच्या बातम्यादेखील दिल्या होत्या. हे बंधारे पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पाठपुरावा करावा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच संजय बडे यांनी दिला आहे.
गेल्या वर्षी 30 ऑगस्ट 2021 रोजी पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोनशे तीस बंधारे, नालाबंडिंग,गावतलाव व जलसंधारणाच्या कामांचे फुटून नुकसान झाले आहे.बंधार्यांच्या बाजूचा भराववाहून गेल्याने पाणी साठवण क्षमता शून्यावर आली आहे. हे बंधारे व नालाबंडिंग दुरुस्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी व कृषी विभागाकडे केली होती. पावसाने नुकसान झालेल्या जलसंधारणाच्या कामांच्या दुरुस्तीसाठी साडेआठ कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याचा अहवाल तालुका कृषी अधिकारी जलसंधारण विभाग स्थानिक स्तर आहे.
(लघुपाटबंधारे) व पंचायत समितीच्या ग्रामिण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकार्यांना पाठविला होता. यासाठी निधी देण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. आमदार मोनिका राजळे यांनी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा व दुरुस्तीसाठी तातडीने निधी मिळवून ही कामे सुरू करावीत, पालकमंत्री, जलसंधारणमंत्री यांनाही निवेदने देऊन मागणी केली असल्याचे बडे यांनी सांगितले आहे.
शेतकर्यांच्या तोंडाला पाने
या अतिवृष्टीमध्ये पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यातील काही शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळाली. मात्र ती अपुर्ण आहे. तर अनेक शेतकर्यांना काहीच मिळाले नाही. त्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप बडे यांनी केला.