
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
विहीर खोदकाम करणार्या दोन कामगारांच्या अंगावर खडक, मातीचा ढिगारा कोसळून मृत्यू झाल्याची घटना सारोळाबध्दी (ता. नगर) शिवारात घडली. प्रल्हाद रोहिदास रक्ताटे (वय 28) व विलास शिवाजी वाळके (वय 40 दोघे रा. लोणी सय्यदमीर ता. आष्टी, जि. बीड) अशी मृत कामगारांची नावे आहेत.
सारोळाबध्दी शिवारात बोरूडे यांच्या विहिरीचे खोदकाम सुरू होते. यासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार होते. ब्लास्टिंगचे स्फोटके ठेवण्यासाठी खडकाला ड्रिल मशीनच्या सहाय्याने छिद्र पाडण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक खडक व मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगार्याखाली विहिरीचे काम करणारे दोन कामगार दबल्या गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान दोन्ही कामगारांचा मृत्यू ढिगारा कोसळून नव्हे, तर जिलेटीन काड्यांच्या स्फोटात झाला असून, त्याला ठेकेदाराचा निष्काळीपणा कारणीभूत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,‘घडलेल्या घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अद्याप नातेवाईक फिर्याद देण्यासाठी आले नसून नातेवाईकांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल’. दरम्यान दोन्ही कामगारांचा मृत्यू ढिगारा कोसळून नव्हे, तर जिलेटीन काड्यांच्या स्फोटात झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.