राहुरी (प्रतिनिधी) -
करोना काळात वीजबिलात सवलत देऊ, अशी घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र, आता महावितरण विभागाने
75 लाख शेतकर्यांना वीजबिल वसुलीच्या नोटीसा पाठविल्या. या धोरणाविरोधात राहुरी तालुका भाजपच्या वतीने महावितरण कार्यालय, राहुरी येथे आंदोलन करण्यात आले.
तालुकाध्यक्ष अमोल भनगडे म्हणाले, राज्य शासनाने शेतकर्यांची मोठी फसवणूक केली आहे. वीज बिलामध्ये सवलत मिळेल, अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. मात्र, आता महावितरण विभागाच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागणार आहे.
जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, युवक अध्यक्ष रवींद्र म्हसे, बाजार समिती व पंचायत समितीचे सदस्य सुरेश बानकर, कैलास पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष नानासाहेब गागरे, शहराध्यक्ष राजेंद्र उंडे, नगरसेवक शहाजी जाधव, प्रभाकर हरिचंद्रे, कुलदीप पवार, बाळासाहेब जठार, राजेंद्र गोपाळे, नयन शिंगी, कैलास पवार, सुकुमार पवार, भैय्या शेळके, विक्रम गाढे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांना निवेदन देण्यात आले.