<p><strong>करंजी |वार्ताहर| Karanji</strong></p><p>पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळील बंधार्यात तिसगाव व करंजी येथे जिलेबी विक्रीचा व्यवसाय करणारे </p>.<p>दोन तरुण गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बंधार्यातील पाण्यात आंघोळ करण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. तर एक मात्र सुदैवाने वाचला आहे.</p><p>याबाबतची सविस्तर माहिती अशी की तिसगाव व करंजी येथे मिठाईचा व्यवसाय करण्यासाठी राजस्थान येथून काही कुटुंब येथे स्थायिक झालेले आहेत. यामधील प्रणव पांडूरंग कुचेकर (वय वर्षे 17 राहणार बीड) व मनेष देवराबी बिष्णोई (वय वर्ष 23 राहणार जोधपुर राजस्थान), लादुराव जगन्नाथ पालेवाल (राहणार जोधपुर राजस्थान) हे तिघे तरुण गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास देवराई येथील बंधार्यात आंघोळ करण्यासाठी गेले असता बंधार्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यापैकी प्रणव व मनेश या दोघांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला.</p><p>तर लादूराम मात्र सुदैवाने वाचला त्याने पटकन महामार्गावर उभे राहून आरडाओरड करून इतरांना मदत मागितली. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी येऊन या तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.</p><p>या घटनेनंतर पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहाय्यक फौजदार रवींद्र चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड यांनी घटनास्थळी येऊन या दोन तरुणाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीला रवाना केले.</p><p>गेल्या काही दिवसांपासून तिसगाव करंजी येथे जिलेबी विक्रीचा व्यवसाय करणार्या या तरुणांच्या आठवणीमुळे तिसगाव करंजी परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.</p>