टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar
आरटीई जागांसाठी लवकरच सोडत होणार असून, शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणार्या प्रवेशाची सोडत (लॉटरी) मार्चअखेरपर्यंत जाहीर होणार आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत येत्या दोन दिवसांत अधिकृतपणे सोडत जाहीर करण्याची तारीख अंतिम केली जाणार आहे. आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता राज्यातील जवळपास 9 हजार 88 शाळांमधील तब्बल एक लाख दोन हजार 22 जागांकरिता सुमारे दोन लाख 82 हजार 776 अर्ज आले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत नोंदणीकृत 400 शाळांमधील प्रवेशासाठी 6957 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 3058 जागा उपलब्ध आहे.
प्रवेश प्रक्रियेमार्फत मुलांच्या प्रवेशासाठी यंदा मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. आरटीई प्रवेशाच्या सोडतीकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
प्रवेश प्रक्रियेत अनेक पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे दिसून आले.
संपूर्ण राज्यात जवळपास तीन ते चार हजार डुप्लिकेट अर्ज दाखल झाले आहेत. आता प्राथमिक शिक्षण विभागामार्फत डुप्लिकेट अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा एक अर्ज ग्राह्य धरण्यात येणार असून उर्वरित अर्ज रद्द केले जातील. हे अर्ज रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे, आरटीईनुसार खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेंतर्गत सोडती जाहीर करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शालेय शिक्षण विभागाकडून येत्या दोन दिवसांत सोडत काढण्याची तारीख जाहीर केली जाणार आहे.