
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
राजकीय कार्यकर्त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. वाचन केले पाहिजे, वैचारिक वारसा जपला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व श्रीरामपूर पं.स. माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी काल मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात शरद पवार यांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. प्रारंभी मुरकुटे दाम्पत्यांनी डॉ. वंदना मुरकुटे यांनी लिहिलेल्या योगीराज गंगागिरी ते सद्गुरू नारायणगिरी महाराज या पुस्तकाची श्री. पवार यांना भेट दिली.
त्यावेळी त्यांनी सराला बेटाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती सवड काढून लिखाण करतात ही कौतुकाची बाब असल्याचे श्री. पवार म्हणाले. राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी राजकारण कमी व समाजकारण जास्त करावे, विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करून शब्दसंपदा वाढवावी. असे सांगितले.
श्रीरामपूर येथील मीनाताई जगधने व स्व.माणिकराव जगधने यांच्या वाटचालीबाबत, अशोक कारखान्याच्या निवडणुकीबाबत, नवीन तंत्रज्ञान, राजकीय, कौटुंबिक विषयांवर यावेळी चर्चा झाली. ज्ञानेश्वर मुरकुटे व डॉ. वंदना मुरकुटे यांच्या कार्याचे कौतुक करून श्रीरामपूर येथे आलो तर त्यावेळी तुमच्या घरी नक्की येईल, असा शब्द श्री. पवार यांनी दिला.