पुणे| Pune
तापमान वाढत असतानाच आता अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. नगर जिल्ह्यातही उद्या मंगळवार आणि बुधवारी पाऊस पडणार असल्याने नगरकरांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यात गत 15 दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. त्यामुळे गहू, कांदा, हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. सध्या करोनाचे थैमान सुरू असतानाच, सर्वजण हैराण झाले आहेत. त्यात आता पुन्हा हे संकट उभे राहिले आहे.
मध्य महाराष्ट्रात चक्रीय वार्याची स्थिती निर्माण झाल्याने पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. काल रविवारी मुंबई, कोल्हापूर व अन्य ठिकाणी पाऊस झाला. आज सोमवारी सांगली, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उद्या मंगळवारी अहमदनगर, रत्नागिरी, सिंधदुर्ग, पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाडा. बुधवारी अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, मराठवाडयात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे..
शेतमाल सुरक्षितस्थळी ठेवा..
आगामी चार दिवसांत राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकर्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच शेतमाल व्यवस्थित ठिकाणी ठेवण्याचेसुद्धा हवामान खात्याने सांगितले आहे.
भंडारदरात वादळी पाऊस
भंडारदरा वार्ताहराने कळविले की, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह भंडारदरा धरण परिसर व पाणलोटात काल सायंकाळी वादळी पाऊस झाला. दिवसभर उकाड्याने सर्वजण हैराण होते. त्यात सायंकाळी 5 वाजता वादळी पाऊस झाला. यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे.