जिल्हा बँकेकडून शेतकर्यांना गाय खरेदीसाठी दीड लाखांचे कर्ज
अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा सहकारी बँकेने चालू हंगाम ात पशुपालन, पक्षी पालन, मत्स्य व्यवसाय, शेळी-मेंढी पालन यासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. प्रत्येकी 15 हजार रुपयांप्रमाणे 10 गायींसाठी दीड लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज शेतकर्यांना अल्प व्याजदरात देण्याचा निर्णय संचालक मंडळाकडून घेण्यात आला आहे.
सेवा सहकारी संस्थेच्या सचिवांनी प्रत्येक गावातून या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करत कमीत कमी 50 शेतकर्यांची प्रकरणे जिल्हा बँकेच्या शाखेकडे पाठविण्यात यावे, असे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
नगर तालुका विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने सेवा संस्थेच्या सचिवांच्या बैठकीत बोलताना माजी मंत्री कर्डिले. यावेळी संचालक रावसाहेब पाटील शेळके, तालुका विकास अधिकारी आनंद शेळके, शेती कर्ज मॅनेजर संजय बर्डे, आस्थापन विभागप्रमुख शैलेश बोधले, गजेंद्र क्षीरसागर, महादेव कराळे, सुनील काळे, सुनील भांड, राजेश नामदे, रामदास सोनवणे व तालुक्यातील सेवा संस्थेतील सचिव आदी उपस्थित होते.
यावेळी कर्डिले म्हणाले, करोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांना आधार देण्यासाठी जिल्हा बँकेने वेगवेगळे निर्णय घेण्याचे काम केले आहे. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, तसेच विविध निर्णयांची माहिती शेतकर्यांना समजून सांगावी. मध्यम मुदत पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक गावातून सुमारे 50 कर्ज प्रकरणे पाठवावीत. अडचणीच्या काळात शेतकर्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.