जिल्हा बँकेने सभासद संस्थांना दोन वर्षांचा साडेबारा टक्के लाभांश द्यावा
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्यातील सहकारी सोसायट्या, गृहनिर्माण संस्था, सहकारी साखर कारखाने, दूध सोसायट्या, पतसंस्था आदी सभासद संस्थांना सन 2020-2021 व सन 2021-22 या दोन्ही वर्षांचा साडेबारा टक्केप्रमाणे लाभांश द्यावा व डबघाईस चाललेल्या संस्थांना जीवदान द्यावे, अशी मागणी माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांनी जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन उदय शेळके यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रात ते म्हणतात, सहकारी संस्था, सोसायट्या यांनी ग्रामीण शेतकर्यांच्या जीवनात अर्थक्रांती आणली. वेळेवर पतपुरवठा झाला व त्यातून ग्रामीण भागात समृद्धी आली. केवळ दोन टक्के तफावतीवर सोसायट्यांचे कर्ज वितरण असते. यातून संस्थेचे वाढत चाललेले खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ घालताना संस्थांना जिकिरीचे झालेले आहे. या संस्थांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. पतपुरवठा सुरळीत झाला. बँकेने आता दोन टक्केऐवजी अडीच टक्केपर्यंत तफावत ठेवून संस्था वाचविण्यासाठी कर्जवितरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शासनाच्या शेतकरी कर्जमाफीच्या मधल्या काळातील संस्थांवर पडलेले व्याज बँकेने झळ सोसून स्वतःकडे घेतले. याबाबत सर्वप्रथम आपण मागणी करून जिल्हा सहकारी बँकेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी व्यवस्थापनाचे आभारही मानले. याचप्रमाणे संस्था वाचविण्यासाठी व ग्रामीण अर्थकारण सुलभ ठेवण्यासाठी वरील मागण्यांबाबतही संयुक्तिक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.