
श्रीरामपुर | प्रतिनिधी
राज्यात गाजलेल्या बेलापूर येतील व्यापारी गौतम हिरण हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या तसेच पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरलेल्या गौतम हिरण हत्याकांड प्रकरण प्रथमतः श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. ७ मार्च २०२१ रोजी गौतम हिरण यांचा मृतदेह सापडल्यामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे या गुन्ह्याचा तपास लक्षवेधी ठरणार होता.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक तसेच नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून पुढील तपास श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर यातील पाच मुख्य आरोपींना अटक करून आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा केल्यानंतर त्यांच्या विविध ठिकाणच्या हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली ओमिनि कार, पल्सर मोटरसायकल, हत्यार तपास कामी जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान एकूण २५ साक्षीदार तपासण्यात आले व एकूण ५०५ पानाचे सबळ पुराव्यासह अजय राजू चव्हाण (वय २६) , नवनाथ धोंडू निकम (वय २३) , आकाश प्रकाश खाडे (वय २२), संदीप मुरलीधर हांडे (वय २६) व जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय २५) यांचे विरुद्ध पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
असा रचला कट
दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी ढग्याचा डोंगर (ता. सिन्नर) येथे सदर गुन्ह्यातील आरोपींनी एकत्र येऊन मयत गौतम झुंबरलाल हिरण यांचे अपहरण करून त्यांना जिवे ठार मारून त्यांचे जवळील रोख रक्कम जबरीने चोरून घेऊन त्यांचे प्रेताची विल्हेवाट लावणेबाबत फौजदारी पात्र गुन्ह्याचा कट रचला होता.