राहाता | तालुका प्रतिनिधी
कॉंग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींबाबत निष्ठा आणि इतर बाबतीत ज्ञान पाजळणा-या आ.बाळासाहेब थोरातांनीच आता खुलासा करण्याची गरज असल्याचे मत महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर तिळगुळ देवून महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले. पदवीधर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये झालेल्या गुप्त चर्चेने निवडणूकीतील संस्पेन्स अधिकच वाढला आहे.
बीड येथील एका कार्यक्रमास जाण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस शिर्डी विमानतळावर १० मिनिट थांबले होते. या दरम्यान पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळगुळ देवून शुभेच्छा दिल्या.
एकीकडे पदवीधर निवडणूकीतील घडामोडी वाढत असताना उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये शिर्डी विमानतळावर झालेल्या चर्चेचा तपशिल उघड झाला नसला तरी, या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री ना.विखे पाटील यांनी सत्यजीत तांबेच्या पाठींब्याबाबत सर्वोतोपरी निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार असून पक्षाकडून ज्या उमेदवाराला पाठींबा दिला जाईल त्याला निवडणून आणण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
कॉंग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींवर विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करताना ना.विखे पाटील म्हणाले की, या घडामोडींबाबत निष्ठेचे धडे देणा-या बाळासाहेब थोरातांनीच आता ख-याअर्थाने खुलासा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करुन, महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होतील तेव्हा त्या उमेदवाराची जाहीर सभा थोरातांनी संगमनेरातच घेतली पाहीजे असा टोला त्यांनी दिला.
कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व पक्षाच्या विचारांशी फारकत घेवून काम करीत आहे. भारत जोडो यात्रा कॉंग्रेससाठी नव्हेतर राहुल गांधीसाठीच असून, स्वत:ची छबी वाढविण्यासाठीच ही यात्रा आहे. या पक्षातून युवक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. भारत जोडो पेक्षा कॉंग्रेस छोडो हा कार्यक्रम वेगाने सुरु असल्यानेच कॉंग्रेसची आवस्था बिकड झाली असल्याची टिका त्यांनी केली.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेत आपले पुत्र सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीसाठी मार्ग मोकळा केला होता. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणी पत्ते उघड करत ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. त्यामुळे सत्यजीत यांचा मार्ग मोकळा झाला असला तरी काँग्रेस पक्षावर रिंगणात उमेदवार नसण्याची नामुष्की ओढवली आहे. हा दगाफटका काँग्रेसच्या जिव्हारी लागला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आक्रमक झाले आहेत. एवढेच नव्हेतर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज न भरणाऱ्या सुधीर तांबे आणि त्यांच्या मुलावर शिस्तभंगाची कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, राधाकृष्ण विखे हे तांबे यांना पाठिंबा देण्यास अनुकूल की प्रतिकूल आहेत, हेही अद्याप उघड झालेलं नाही. नगरमध्ये बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सावध भूमिका घेत पक्ष देईल तो आदेश मान्य करू, असं म्हटलं होतं. नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत भाजपचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जो काही निर्णय पक्ष संघटनेच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून दिला जाईल, त्या सूचनांचे तंतोतंत पालन नगर जिल्ह्यात केले जाईल. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युतीचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्यजित तांबे यांच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारताच याबाबत थोरातांनाच काय वाटतंय, याविषयी विचारावे, असे उत्तर माध्यमांना दिले.