संगमनेर (प्रतिनिधी) / sangamner - निळवंडे धरणातून शहराला पाणीपुरवठा करणार्या मेन व्हॉल्व दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येणार असल्याने शनिवार दि. 17 जुलै पासून शहराला होणारा दैनंदिन पाणीपुरवठा एक दिवस आड व कमी दाबाने करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी दिली आहे.
निळवंडे धरणातून पाईप लाईनद्वारे संगमनेर शहराला करण्यात येणार्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य व्हॉल्व नादुरुस्त असल्याने सदर व्हॉल्वच्या दुरुस्तीसाठी किमान एक आठवडा लागण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या कालावधीत निळवंडे धरणातून संगमनेर शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरात पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे शनिवार दि. 17 जुलै पासून संगमनेर शहर व उपनगरात एक वेळ व एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल.
तरी शहरातील नागरीकांनी याची नोंद घेऊन पाणी साठा योग्य प्रमाणात करावा व पाण्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच आपल्या नळास तोट्या बसवून घ्याव्यात, जेणेकरुन पाण्याचा अपव्यय होणार नाही. रस्त्यावर पाण्याचा सडा मारु नये. याबाबत नागरीकांनी दक्षता घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपाध्यक्ष शैलेश कलंत्री, पाणी पुरवठा समिती सभापती मालती डाके, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी केले आहे.