टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
येथील दावल मलिक दर्गा मिळकतीवरील अतिक्रमणाचा प्रश्न अनेक वर्षांपासुन चर्चेत आहे. गेली साठ ते सत्तर वर्षे काही अतिक्रमणधारक या मिळकतीत वास्तव्यास आहेत. औरंगाबाद खंडपिठाने हे सर्व आतिक्रमण निस्कासित करण्याचे आदेश दिले असून याबाबत प्रांताधिकारी श्रीरामपूर यांच्यासमोर आज सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.
थेथील दावल मलिका दर्गा मिळकत गट नंबर 249 वरील अतिक्रमणाचा वाद अनेक वर्षे न्यायप्रविष्ठ होता. या मिळकतीवर सुमारे 35 अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण करुन व्यवसाय व रहिवासी वापर केला जात होता. श्रीरामपुरचे तहसिलदार प्रशांत पाटील यांनी अतिक्रमणधारकांना नुकतीच नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाच्या 27 एप्रिल 2022 च्या अतिक्रमण हटविण्याच्या आदेशाबाबत कळवण्यात येते की, टाकळीभान येथील दर्गा दावल मलिक रहेमतुल्ला मौजे टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथील वक्त मिळकत गट नं. 249 मध्ये आतिक्रमण निष्कासित करण्याचे अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात रीट याचिका नं. 14186/2018 दाखल केलेली आहे.
तसेच याबाबत दाखल रीट याचिका क्र. 7636/2019 मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने 27 एप्रिल 2022 रोजी आदेश पारीत केलेला आहे. सदर आदेशात नमुद केल्याप्रमाणे उपविभागिय आधिकारी श्रीरामपूर यांचेसमोर दि. 10 मे 2022 रोजी दुपारी 12 वाजता सुनावणी ठेवली आहे. दाव्याच्या पुष्ठ्यर्थ पुराव्यासह हजर न राहील्यास पुढील निर्णय घेण्यात येईल, असे नोटीसांमध्ये नमुद करण्यात आले आहे.
या नोटीसांमध्ये एकुण 35 आतिक्रमण धारकांची नावे आहेत. कामगार तलाठी यांनी या नोटीसा बजावल्या आहेत. यातील बहुतांश अतिक्रमणधारकांनी या मिळकतीत व्यवसाय थाटले आहेत तर काही रहिवासी म्हणून वापर करीत आहेत. मात्र या नोटीसांमुळे सर्व अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.