
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शेतकर्यांनी पिकांची वेळेत पेरणी करून मशागत केल्यास त्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळते. शेतकर्यांना पिकाच्या लागवडीसाठी पीककर्जाची निकड दरवर्षी भासते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बँकांनी कुठलेही कारण न देता त्यांना देण्यात आलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी दिले. उद्दिष्ट पूर्ण न करणार्या तसेच सहकार्य न करणार्या बँकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही दिला.
नगर जिल्हा हा कृषी प्रधान जिल्हा असून जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. चालू वर्षाच्या खरीप हंगामात मे महिना संपला असतानाही जिल्ह्यातील बँकांनी दिलेल्या उद्दिष्टांपैकी अत्यंत कमी पीककर्ज वाटप केले आहे, ही बाब खेदजनक आहे. बँकांनी शेतकर्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन कोणतेही कारण न देता येत्या 30 जूनपर्यंत पीककर्ज वाटप करावे. ज्या बँका त्यांना दिलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत, अशा बँकांना नोटीस देण्याबरोबरच त्यांचा अहवाल रिझर्व्ह बँकेला सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शासनाच्या अनेकविध योजनांचा निधी लाभार्थ्यांपर्यंत बँकेच्या माध्यमातून पोहोचविण्यात येतो. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार या बँकामार्फत करण्यात येत असल्याने बँकांना याचा मोठा लाभ होतो. शेतकर्यांना पीक कर्जाचे वाटप न करणार्या बँकाना प्रशासकीय पातळीवर कुठल्याही प्रकारचे सहकार्य न करता अशा बँकामध्ये असलेल्या शासकीय ठेवी काढुन घेण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी सांगितले.