नुकसान भरपाई देण्यास शासन कमी पडणार नाही - ना. विखे

नुकसान भरपाई देण्यास शासन कमी पडणार नाही - ना. विखे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

यापुर्वी तालुक्यात गारपीट आणि अतिवृष्टीने नूकसान झालेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांना युती सरकारने 6 कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे. नव्याने झालेल्या नूकसानीची भरपाई देण्यास शासन कुठेही कमी पडणार नाही. या संकटात सरकार तुमच्या सोबत असल्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्री विखे पाटील यांनी तालुक्यातील पश्चिम भागातील गावात अतिवृष्टी आणि गारपीटीने नूकसान झालेल्या गावात जावून शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. अतिवृष्टीने प्रत्येक पिकाचे किती क्षेत्र बाधीत झाले याची आकडेवारी त्यांनी महसूल आणि कृषी विभागाकडून जाणून घेतली. तसेच पंचानाम्याचा आढावाही घेतला.

मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीने द्राक्ष, डाळींब, कांदा, टोमॅटो या पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. या नूकसानीच्या ठिकाणी जावून मंत्री विखे पाटील यांनी हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना धीर देवून या संकटात शासन तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.

राज्य सरकारने आज पर्यंत झालेल्या सर्वच नैसर्गिक संकटात शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. यासाठी एनडीआरफचे नियम आणि निकष सुध्दा बदलले. शेतकर्‍यांना हेक्टरी मदत देण्यासाठी असलेली मर्यादा सुध्दा वाढवली असल्याचे सांगून आता मदतीसाठी सततचा पाऊस सुध्दा ग्राह्य धरण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. आजच्या दौर्‍यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा अनुदानाच्या बाबतीत नव्याने काही सूचना दिल्या असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

नगर जिल्ह्याकरीता नैसर्गिक आपतीची आता पर्यंत 270 कोटी रुपयांची मदत उपलब्ध झाली असून, उर्वरीत मदत येत्या काही दिवसात मिळणार आहे. संगमनेर तालुक्या करीता झालेल्या नूकसानीपोटी 6 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. नव्याने बाधीत झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासन मदतीचा निर्णय करेल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही याची खात्री शेतकर्‍यांना आम्ही बांधावर जावून देत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. याप्रसंगी महसूल कृषी विभागाच्या अधिकार्‍यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विरोधकांकडून होणार्‍या टिकेवर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले की, अयोध्येत गेलो तरी प्रभू श्रीरामचंद्राकडे हे संकट टळो अशीच प्रार्थना केली. कुठेही सरकारचे दुर्लक्ष झालेले नाही.आता जे टिका करतात त्यांच्यात ‘राम’ राहीलेला नाही, त्यामुळे त्यांच्या टिकेला महत्व द्यायचे कारण नसल्याचे सांगितले.

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात राहाता तालुक्याचा दौरा करणार असल्याकडे लक्ष वेधले असता यात गैर काय? ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांनी पाहणी करून काही सूचना केल्या तर निश्चित त्याचा विचार करू अशी कोपरखळी लगावली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com