
पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील पिकांचे मोठे नुकसान झालेले असताना देखील खरीप हंगामात पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकर्यांना विमा कंपनीने दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकर्यांच्या बँक खात्यात तुटपुंजी रक्कम जमा करून शेतकर्यांची हेळसांड केल्याचा आरोप येथील पीक विमा सहभाग घेतलेल्या 765 शेतकर्यांनी केला आहे.
या भागात सतत पडणार्या पावसाने परिसरातील सर्व पिके नष्ट झाली आहे.पीक विमा कंपनी शेतकर्यांच्या बँक खात्यात पीक विमा परताव्याची तुटपुंजी रक्कम जमा करून शेतकर्यांची अशी चेष्टा करीत असेल तर योजना फसवी असून ती फक्त शेतकर्यांना लुटण्यासाठी असल्याचा आरोप देखील येथील शेतकर्यांनी केला आहे.
पाचेगावचे ग्रामदैवत गहिनीनाथ महाराज येथील सभामंडपात सर्व पीक विमाधारक शेतकरी एकत्र येत चर्चा विनिमय करण्यात येऊन, त्यात नेवासा तहसीलदार, जिल्हा कृषी अधीक्षक, उप कृषी अधिकारी श्रीरामपूर, नेवासा तालुका कृषी अधिकारी व आमदार शंकरराव गडाख यांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
याप्रसंगी उपसरपंच श्रीकांत पवार, माजी सरपंच दत्तात्रय पाटील, ग्रामपंचायत सदस्य वामनराव तुवर, सोसायटीचे अध्यक्ष भगीरथ पवार, शेतकरी संघटनेचे हरिभाऊ तुवर, कैलास पवार, भारत सर्व सेवा संघाचे सचिव प्रकाश जाधव, दिलीप पवार, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब उंडे, शांताराम तुवर, सुधाकर शिंदे, अशोक पवार, बाळासाहेब शिंदे, पंढरीनाथ शिंदे, काशिनाथ मतकर, दिगंबर तुवर, संतोष साळुंके, जालिंदर विधाटे, गोपीनाथ पडोळ, भाऊसाहेब गायकवाड, किशोर क्षीरसागर, भगवान मतकर, गंगाधर मतकर, ज्ञानेश्वर वीर, डॅनियल देठे, धर्मा बर्डे, रामदास भिसे, भैय्या शेख, ज्ञानेश्वर मतकर, अमोल आचपळे, बाळासाहेब जाधव, मुस्सा शेख आदींसह शंभर ते दीडशे शेतकरी उपस्थित होते.