
अहमदनगर (प्रतिनिधी) -
महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते वाईन पिऊन माध्यमांसमोर बोलतात. वाईन विक्रीचा निर्णय न बदलल्यास काही दिवसांनी मंत्रीही वाईन पिऊन जिल्ह्यात बैठका घेतील, अशी खोचक टीका खा. डॉ. सुजय विखे यांनी सरकारवर केली आहे.
खा. विखे आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. तेव्हा माध्यमांसमोर ते बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रात केलेल्या टिकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, हजारे यांचे संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित आहे. ते देशाचे सुपुत्र आहेत. एखाद्या वृत्तपत्रात अण्णांवर चुकीच्या पद्धतीने अग्रलेखाच्या माध्यमातून कुणी टीका करत असेल तर अग्रलेख लिहणारे हे वाईन घेऊन अग्रलेख लिहत असतील. महाविकास आघाडीचे प्रवक्ते सध्या वाईन पिऊन माध्यमांसमोर बोलतात. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी खरमरीत टीका खा. विखे यांनी केली. सामना किंवा खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता ही टीका त्यांनी केली आहे.
लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खा. सुप्रिया सुळे आणि खा. सुजय विखे यांनी केलेल्या भाषणाची चर्चा राज्य आणि देशभर सध्या सुरू आहे. याबाबत छेडले असता ड़ॉ. विखे म्हणाले की, कोणीही माझ्यावर कौटुंबिक किंवा वडिलांवर टीका करू नये. जनतेने नगर जिल्ह्यातून आम्हाला निवडून दिलेले आहे.