
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
बांधावरील काटे (काटेरी झुडूपे) आम्हाला न विचारता का तोडले? असे विचारल्याचा राग आल्याने सहा जणांनी मिळून पती, पत्नी व मुलाला कुर्हाड, काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे घडली.
लक्ष्मीबाई सर्जेराव विटनोर, (वय 60) रा. तिळापुर ता. राहुरी यांची तिळापूर शिवारात शेतजमीन आहे. सदर जमीनीशेजारी किसन येळे यांची शेतजमीन असून त्यांच्या शेतीचा सामाईक बांध आहे. लक्ष्मीबाई विटनोर या घरी जात असताना आरोपी हे विटनोर यांच्या घराजवळील शेताच्या सामाईक बांधावरील काट्याची झाडं तोडताना दिसले तेव्हा लक्ष्मीबाई विटनोर, त्यांचे पती सर्जेराव, मुलगा सुनिल हे सामाईक बांधावर गेले व आरोपींना म्हणाले की, तुम्ही बांधावरील काट्या आम्हाला न विचारता का तोडता? असे विचारले असता आरोपी म्हणाले की, तुम्ही आम्हाला कोण विचारणार, हा आमचा बांध आहे. तेव्हा विटनोर त्यांना म्हणाले की, आम्ही स्वतः आमच्या हद्दीत हा बांध टाकलेला आहे असे सांगीतले.
याचा त्यांना राग आल्याने आरोपींनी लक्ष्मीबाई विटनोर, त्यांचे पती व मुलाला शिवीगाळ करुन कुर्हाड व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच तुम्ही आमच्या नादी लागले तर जिवे ठार मारु, अशी धमकी दिली. लक्ष्मीबाई विटनोर यांच्या फिर्यादीवरून भिकाजी भिमाजी भगत, भिमाजी चिमाजी भगत, शरद गंगाराम येळे, जयराम गंगाराम येळे, माधव किसन येळे, दशरथ माधव येळे, सर्व रा. तिळापूर ता. राहुरी या सहा जणांवर गुन्हा रजि. नं. 1278/2022 भादंवि कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश भवार हे करीत आहेत.