<p><strong>कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav</strong></p><p>कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा बहुमताच्या जोरावर </p>.<p>सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागाचे सर्व विषय नामंजूर करून शहरविकासासाठी आलेला अंदाजे साडे आठ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता असून सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांकडून शहरविकासाला खीळ घातली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी-शिवेसना नगरसेवकांनी केला आहे.</p><p>पत्रकात म्हटले आहे, यापूर्वी झालेल्या दोन स्थायी समितीच्या बैठकीत विकास कामांबाबत भाजपा नगरसेवकांनी अनेक प्रश्न उपस्थित करून बहुमताच्या जोरावर बांधकाम विभागाचे सर्व विषय नामंजूर करून धन्यता मानली. मंगळवारी पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत सविस्तर चर्चा होऊन शहरविकासाचा मार्ग मोकळा होईल अशी सर्वसामान्य कोपरगाव शहरवासीयांची अपेक्षा होती. </p><p>यापूर्वी भाजपा नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची व शंकांची नगराध्यक्ष विजयराव वहाडणे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे यांनी सविस्तरपणे खुलासा करून देखील पुन्हा एकदा सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी बांधकाम विभागाचे हे सर्व विषय नामंजूर करून शहरविकासाशी देणंघेणं नसल्याचे दाखवून दिले आहे.</p><p>यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष नगरेसवक संदीप वर्पे, गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, महेमूद सय्यद, शिवसेनेच्या सपना मोरे यांनी कोपरगाव शहराच्या बाबतीत पोटतिडकीने सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या मुद्यांचे स्पष्टीकरण देऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी आपली परंपरा कायम ठेवून बहुमताच्या जोरावर पुन्हा शहरविकासाला तिलांजली दिली असल्याचे राष्ट्रवादी-शिवेसना नगरसेवकांनी म्हटले आहे.</p>