राहुरी (प्रतिनिधी) -
राहुरी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून करोना संक्रमणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज करोना रूग्णांची
संख्या शतकापार झळकत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. करोनाबाधितांमध्ये तरूण आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे.
दरम्यान, गेल्या 72 तासात 364 जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे करोना महामारी नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला अपशय आले आहे. राहुरी शहरात तीन दिवसात 74 जणांना करोनाने ग्रासले आहे. मात्र, तरीही शहरात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला असून ग्रामीण भागातही करोनारूग्णांची संख्या वाढू लागली आहे. अद्यापपर्यंत तालुक्यातील 74 नागरिकांचे करोनाने बळी घेतले आहेत.
तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये रूग्णांची मोठी हेळसांड होत असून ऑक्सिजन, बेड आणि रेमिडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होत असून आर्थिक पिळवणूक होत आहे. त्याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. इंजेक्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन देणार्या खा. सदाशिव लोखंडे यांचे आश्वासन हवेतच विरले असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर प्रशासनही यावर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.