तिसरी लाट रोखण्यासाठी मास्टर प्लान

पालकमंत्री मुश्रीफ : पायभूत सुविधा निर्माण करण्यावर भर
तिसरी लाट रोखण्यासाठी मास्टर प्लान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी आपण जनता कर्फ्यू पुकारला. कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु केली. मात्र, अद्यापही नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 15 दिवस अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने आणि दूध वगळता इतर व्यवहार पूर्णपणे बंद करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पुढील तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन त्याचा सामना करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी शक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, संसर्गाची साखळी तोडायची असेल तर करोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे मुकाबला केला. त्याचपद्धतीने आता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.

ग्रामपातळीवरील दक्षता समित्या आणि नागरी भागातील प्रभाग समित्यांनी आता क्रियाशील होण्याची आवश्यकता आहे. संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑक्सिजनची उपलब्धता, औषधांची उपलब्धता, बेडस् उपलब्धता या बाबींकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने जिल्हा नियोजन ऩिधीतील 30 टक्के रक्कम कोविड उपाययोजनांसाठी उपयोगात आणण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार, जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांटसाठी 11 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून नगर, कर्जत, श्रीरा्मपूर, पाथर्डी, संगमनेर येथे 250 जम्बो सिलींडर दैनंदिनरित्या भरतील एवढ्या क्षमतेने ऑक्सीजन निर्मिती अपेक्षित असून लवकरच त्यासंदर्भातील निर्णय होईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या 100 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्राप्त करुन घेतले आहेत. त्यासाठी 46 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणार्‍या बाबींव्यतिरिक्त जिल्ह्यातील आमदारांनी त्यांचा निधी आरोग्यविषयक त्या-त्या भागातील अत्यावश्यक सुविधांसाठी उपयोगात आणावा, अशी सूचनाही त्यांनी केली. आगामी काळात जिल्ह्यासाठी लागणारी औषधांची गरज लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयास या बाबींसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर एकच लॅब आहे. अजून एक लॅब निर्मितीसाठीही निधीची उपलब्धता करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर जिल्ह्यासह इतरत्रही मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम झाले. लोकांची गर्दी वाढली. त्यामुळे दुसर्‍या लाटेत संसर्ग वेगाने वाढला.

जिल्ह्यात सध्या रेमडेसिवीर वाटप महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र याप्रमाणे केले जात आहे. सध्या पाहिजे त्याप्रमाणात रेमडेसीवीर उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती असली तरी जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेला साठा हा नागरी भाग आणि ग्रामीण भागासाठी समप्रमाणात वाटप केले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, खा. सदाशिव लोखंडे, आ. बबनराव पाचपुते, आ. रोहित पवार, आ. लहू कानडे, आ. आशुतोष काळे, आ. डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, पोलीस उप अधीक्षक प्रांजल सोनवणे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे आदींची यावेळी उपस्थिती होती.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी एमआयडीसीतील दोन्ही ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना भेट दिली. त्याठिकाणी ऑक्सिजन वितरण व्यवस्था कशी आहे, दररोज किती ऑक्सिजन निर्मिती होते, काही अडचणी आहेत का, याची विचारणा करुन माहिती घेतली. पोलीस परेड मैदानावरील कोविड केअर सेंटरलाही त्यांनी भेट दिली. यावेळी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com