अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar
करोनाग्रस्तांच्या मृत्युनंतर मृतदेहावर प्रशासनाकडूनच सुरक्षेच्या उपाययोजना करून अंत्यसंस्कार करण्यात येतात. मात्र या अंत्यसंस्कारावेळी मृतदेहांची प्रचंड अवहेलना व हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार नगरच्या जिल्हा रुग्णालयात उघडकीस आला आहे.
याप्रकरणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिले असून मानवतेला काळीमा फासणारे प्रकार सध्या सुरू असल्याचे म्हटले आहे. दोन दिवसांत या व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईल आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा बोराटे यांनी दिला आहे.
मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात बोराटे यांनी नमूद केले की, करोनाचा उद्रेक होत असताना प्रशासकीय पातळीवर ज्या पध्दतीने उपाययोजना होणे अपेक्षित आहे, तशा त्या होताना दिसून येत नाही. माळीवाडा भागातील एका मित्राचे वडील करोनामुळे मयत झाले.
त्यांना पाहण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेलो असता त्याठिकाणी एकाच शववाहिकेत दिवसभरात मयत झालेले मृतदेह एकावर एक रचून अस्ताव्यस्त ठेवलेले दिसून आले. एका शववाहिकेत 12 मृतदेह होते. इतका भयंकर प्रकार पाहिल्यावर मन हेलावून गेले. मयत झालेल्या रुग्णांना अशा प्रकारे अंत्यविधीसाठी नेणे मानवतेला काळीमा फासणारे आहे. प्रशासनाचा भोंगळ कारभार यातून उघड होत असून यात सुधारणा करण्याची मागणी बोराटे यांनी केली आहे.