अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी राज्यात सहकार चळवळ रुजवत साखर कारखान्यांच्या माध्यमातून सहकार चळवळीला नवचैतन्य प्राप्त करून दिले. सहकार तत्त्वाने त्यांनी काम केल्याने जिल्ह्याची ओळख सहकार क्षेत्रात राज्यभर झाली. गट शेती ही संकल्पना सहकाराचाच एक भाग आहे. नगर जिल्हा गट शेतीवर आघाडीवर आहे. त्या माध्यमातून 450 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या. ही सहकाराची मोठी चळवळ आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या उदयास आल्या. याचे सर्व श्रेय डॉ. विखे यांना जाते, असे प्रतिपादन जिल्हा अथीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले.
सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीदिनी कृषी विभाग येथे शेतकरी दिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जगताप बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, आत्माचे कृषी उपसंचालक राजाराम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, तंत्र अधिकारी बाळासाहेब नितनवरे, तंत्र अधिकारी अशोक डमाळे, कृषिभूषण विष्णूपंत जरे, प्रगतिशील शेतकरी नाथा देशमुख, मंडळ कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर, जालिंदर गांगर्डे, विजय सोमवंशी, शंकर खाडे, श्रीकांत जावळे, संजय मेहेत्रे, उमेश डोईफोडे, बाळासाहेब भुजबळ आदींसह शेतकरी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, सहकार तत्त्वात मोठी ताकद आहे. संघटनात्मक काम केली तर मोठी ताकद निर्माण होते, हे गटशेती सिद्ध झाले. पद्मश्रींचा वारसा पुढे चालविण्याचे काम आम्ही सर्वजण करीत आहोत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांनी दूरदृष्टीने घेतलेले अनेक चांगले निर्णय आज परिणामकारक ठरताना दिसत आहेत. शेती ही एक उपजीविका आहे हे त्यांनी आपल्या दाखवून दिल्याचे ते म्हणाले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, आत्माचे कृषी उपसंचालक राजाराम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले आदींसह शेतकरी नाथा देशमुख, सागर भुतकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय मेहेत्रे यांनी करून आभार मानले.