दुषित पाण्यामुळे सीना नदीचे आरोग्य धोक्यात : प्रदूषणात वाढ

मृत मासेही आढळले
दुषित पाण्यामुळे सीना नदीचे आरोग्य धोक्यात : प्रदूषणात वाढ

अहमदनगर (प्रतिनिधी) -

महापालिका हद्दीत प्रभाग सात नागापूर या भागात सीना नदी पात्रात एका बड्या कंपनीचे दुषित, केमिकल युक्त पाणी

सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे नदीचे आरोग्य धोक्यात आले असून नदी पात्रातील मासे मृत पावले असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या भागात चरण्यासाठी येणार्‍या जनावरांसह परिसरातील वस्तीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नगर मनपा हद्दीत प्रभाग सातमध्ये नगर-मनमाड महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर नागापूर वसाहतीला लागून सीना नदीचे पात्र आहे. गेल्या कितेक वर्षापासून या ठिकाणी गाळ साचल्याने नदी पात्र हे नागापूरच्या बाजूने अरूंद झाले आहे. त्याच एमआयडीसी भागातील एका एक बड्या कंपनीचे दुषित पाणी थेट नदी पात्रात सोडण्यात आलेले आहे. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी फैलावली आहे. नदी पात्रला खेटून नागापूर वसाहात आहे. या ठिकाणी दाटीवाटीने नागरिकांची लोकवस्ती असून त्याठिकाणी नदीच्या दुषित पाण्याचा दर्प असून यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्यांचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्या सीना नदीपात्रातील पाणी हिवरे आणि काळसर दिसत आहे. या पाण्यात केमिकल युक्त पाणी मिसळ्यामुळेच त्याचा रंग आणि वास बदला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. यासह पाण्याला उग्र वासही आहे.

नागापूर वसाहत परिसारातील म्हशी आणि गायी भागात गवत चारण्यासाठी येतात. जनावरे चारा खावून झाल्यावर याठिकाणी नदी पात्रातील दुषित पाणी पित आहेत. यामुळे त्यांचा आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे.

नदी पात्रातील दुषित पाण्यामुळे जर मासे मरत असतील तर अन्य प्राणी आणि माणसांची गत काय? यामुळे प्रर्दुषण महामंडळाने तातडीने याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांंमधून व्यक्त होत आहे. या ठिकाणी नदी पात्रात घातक असणारा मांगूर मास दुषित पाण्यामुळे मृत पावत असले तर बाकीच्याचा विषय संपलेला आहे. यामुळे तातडीने या ठिकाणी प्रर्दुषण महामंडळाने कार्यवाही करण्याची गरज आहे.

परिसरातील शेतात ऊसाशिवाय दुसरे कोणतेच पिक येत नसल्याचे परिसारातील नागरिकांनी सांगितले. नदी पात्रातील दुषित पाण्यामुळे या भागातील शेतीत अन्य कोणते कोणतेच पिक घेत नसल्याने शेतकर्‍यांची अडचण झाली आहे. या भागातील नदी पात्रला नाल्याचे स्वरूप आले असून फेसाळलेले, उग्र दुर्प असणार्‍या पाण्यामुळे सर्वांचे आरोग्य धोक्यात आहे.

दरम्यान, नदी पात्रातील मृत माशांबाबत आणि पाणी प्रर्दुषीत असल्याबाबत प्रर्दुषण महामंडळाचे संजीव रिदासने यांच्याशी संपर्क साधाला असता त्यांनी आज (सोमवारी) महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी पाठवून मृत मासे आणि संबंधीत भागाची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com