
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसने टिळक भवन या पक्ष कार्यालयात 2 आणि 3 जून रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदार संघांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून बैठकीला राज्यातील प्रमुख नेते, सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
आज 2 जून रोजी पहिल्या दिवशी नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, दक्षिण अहमदनगर, शिर्डी, सिंधुदुर्ग रत्नागिरी, ठाणे, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ वाशिम, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, भंडारा गोदिया, वर्धा, नागपूर, रामटेक आणि पालघर या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. तर उद्या, शनिवारी 3 जून रोजी पुणे, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सोलापूर, माढा, बारामती, शिरुर, मावळ, रायगड, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड, ठाणे, भिवंडी व कल्याण या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
या आढावा बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस पक्षाचे सर्व माजी मंत्री, विधान परिषद गटनेते सतेज पाटील तसेच प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य उपस्थित असतील. तसेच लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, 2019 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार बैठकीला हजर राहतील.