अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्ह्याचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर’ नामकरण करण्यासाठी नामांतर कृती समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या नामांतर रथ यात्रेचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी कोल्हापुर येथील पट्टमकोडवली येथील पुजारी नारायण खाणू मोठे देसाई, कृती समितीचे विजय तमनर, राजेंद्र तागड, सचिन डफळ, काका शेळके, निशांत दातीर, विनोद पाचारणे, अॅड.अक्षय भांड, ज्ञानेश्वर बाचकर, अशोक कोळेकर, अण्णासाहेब बाचकर, शारदा ढवण, दत्तात्रय खेडेकर, अशोक विरकर, राजेंद्र पाचे, डि.आर. शेंडगे, अशोक होनमाने, भगवान जर्हाड, बाबासाहेब तागड आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले, नागपूर हिवाळी अधिवेशनात आ. गोपीचंद पडळकर, आ. राम शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर यांनी नगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर व्हावी, अशी मागणी केली होती.
यावेळेस या मागणीला उत्तर देताना राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव आल्यावर सरकार या नावासाठी अनुकूल आहे, असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे. यानुसार राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, पोस्ट ऑफिस, रेल्वे विभाग, सुरक्षा विभाग आदि विभागांना पत्र पाठवून प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना देण्यात आला.
परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे पाठविण्यात आलेला नाही. यासाठी नामांतरण कृती समितीच्यावतीने 9 फेब्रुवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव चौंडी येथून नामांतर रथयात्रा सुरू करण्यात आली होती. या रथयात्रेच्या माध्यमातून 14 तालुक्यांमध्ये जाऊन अनेक ग्रामपंचायतींचे ठराव, नगरपालिका ठराव, सामाजिक संघटनांचा पाठिंबा उत्स्फूर्तपणे या समितीला मिळालेला आहे. या नावाची मागणी लोकाभिमुख होत आहे. तरी याप्रश्नी लक्ष घालून राज्य शासनाला प्रस्ताव पाठवावा, असे निवेदनात म्हटले आहे.