
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने कोविडमुळे बंद असणार्या जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेला मान्यता दिली होती. त्यानुसार नोव्हेंबर 2022 ग्रामविकास विभागाने आदेश काढत भरती प्रक्रिया राबवण्यासाठी वेळापत्रक निश्चित करून दिले होते. झेडपीच्या रिक्त जागांच्या 80 टक्के जागांसाठी जानेवारी महिन्यांपासून भरती प्रक्रियेची तयारी सुरू होणार होती.
मात्र, नाशिक पद्वीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आरसंहितेमुळे सर्व काही ठप्प झाले आहे. तर फेबु्रवारी-मार्चमध्ये झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने झेडपीच्या रिक्त जागांसाठी होणारी भरती पुढे ढकलली जाणार असल्याची चर्चा ग्रामविकास विभागात आहे.
नगर जिल्हा परिषदेच्या एकूण रिक्त जागांच्या 80 टक्के जागा म्हणजे संभाव्य 1 हजार 200 जागांसाठी भरती होण्याची शक्यता होती. यासाठी जिल्हा परिषदेच्या 9 विभागांनी त्यांचे मंजूर कर्मचारी पद संख्येनूसार रोष्ट्रर विभागीय आयुक्त यांच्याकडून तपासून घेतलेले आहे. नगर जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये सर्वाधिक जागा या आरोग्य विभागातील 612 आणि 31 अशा एकूण 648 जागा असून या जागांसाठी भरती होण्याची शक्यता आहे.
या रिक्त जागा या आरोग्य सेवक पुरुष आणि महिला (हंगामी कर्मचारी, फवारणी कर्मचारी आणि अन्य कर्मचारी), औषध निर्माण अधिकारी यांचा आदिवासी भाग (पेसा) आदिवासी भागा बाहेरील (नॉनपेसा) यांचा समावेश आहे. यासह अन्य विभागातील रिक्त जागांचा समावेश आहे.
ग्रामविकास विभागाच्या भरतीच्या वेळापत्रकानूसार भरतीसाठी डिसेंबर 2022 अखेर झेडपीच्या सर्व विभागाना त्यांचे रोष्ट्रर तपासून ते विभागीय आयुक्त यांच्याकडून मंजूर करूणे घ्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर भरतीसाठीची जाहिरात प्रसिध्द करणे कालावधी 1 आठवडा 1 ते 7 फेब्रुवारी. उमेदवारी अर्ज मागवणे 14 दिवस 8 ते 22 फेब्रुवारी.
उमेदवारी अर्जाची छानणी करणे वेळ 1 आठवडा 23 फेब्रुवारी ते 1 मार्च. जिल्हा परिषद व जिल्हा निवड मंडळाने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनसंदर्भात कार्यवाही करणे 1 महिना 6 मार्च ते 5 एप्रिल. पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून संबंधित उमदेवारांना उपलब्ध करून देणे 1 आठवडा 6 ते 13 एप्रिल. परीक्षेचे आयोजन करणे (ऑनलाईन /ऑफलाईन) 14 ते 30 एप्रिल आणि अंतिम निकाल जाहीर करणे व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे 1 महिना 1 ते 31 मे असे वेळापत्रक ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पाठवलेले होते.
जानेवारीत नाशिक पद्वीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहिता लागू झालेली आहे. ही आचारसंहिता संपतेना संपते तेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तसेच झाल्यास जिल्हा परिषदेच्या भरतीचे नियोजित वेळापत्रक बदलणार असून भरती प्रक्रिया ही पुढे ढकलावी लागणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना आणखी काही महिने वाट पाहवी लागणार आहे.